'चैतन्यवीर आमोणा' या युवा मंडळाने आमचे आमोणा या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गावात आपुलकीने स्वागत केले. आजपर्यंत मला आमोणा म्हणजे केवळ खजिन खाणी, सेझा गोवा मिनरल्स आणि वेदांता या कंपन्या तिथे असल्याचे परिचित होते. मात्र, प्रा. राजेंद्र केसरकर यांनी परिक्रमेच्या निमित्ताने आमोणा गावाची दुसरी बाजू म्हणजेच त्यांचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध पर्यावरणीय जैवविविधतेचे महत्व आम्हाला उलगडून दाखवले.
आमोणा हे केवळ एक औद्योगिक गाव नाही, तर गोमंतकाच्या प्राचीन राजकीय, व्यापारी आणि कृषी समृद्धीचा एक महत्वाचा साक्षीदार आहे. हे गाव ६६१ हेक्टर परिसरात पसरलेले आहे. श्री वेताळ मंदिराचे १९८४ मध्ये नूतनीकरण करण्यात आले. या मंदिराच्या शिलालेखात या गावात आम्रवन असल्याचा उल्लेख आहे, कदाचित यामुळेच या गावाला 'आमोणे' हे नाव पडले असावे.
एका बाजूने कुडणे ही वळवंटी नदीची उपनदी आमोणे येथून वाहत येते. दुसऱ्या बाजूने कारापूरहून येणारे पाणी आमोणा गावाला खाडी (मानस) रूपात वेढते, तर तिसऱ्या बाजूने वळवंटी नदी डिचोली नदीशी एकरूप होते आणि पुढे आमोण्यातून वाहत जाऊन मांडवीला मिळते.
मांडवी नदीच्या सुपीक गाळाच्या किनाऱ्यावर आणि जलवाहतुकीच्या मध्यवर्ती स्थानामुळे आर्य, प्रशासक आणि व्यापाऱ्यांनी येथे वसाहत केली. पुरातत्व विभागाला पुरेशी अस्सलता असणाऱ्या वास्तूच्या अवशेषांवरून, वसाहतींच्या पायांवरून तसेच मंदिरांमधील प्राचीन शिळांवरून हे स्पष्ट होते की, आमोणा ही कधीकाळी प्राचीन इतिहासाचा साक्षीदार असला पाहिजे हे असे एक महत्त्वाचे केंद्र असले पाहिजे, जे पुढे मराठा काळातही कायम राहिले.
काजूच्या बागा आणि सुपीक शेतीने नटलेली ही भूमी एकेकाळी राज्यातील व्यापाराचे महत्वाचे केंद्र होती. पूर्वी फेरी सेवेवर अवलंबून असलेले हे गाव आज आमोणा-खांडोळा पुलाने जोडले गेले आहे.
हे गाव श्री महालक्ष्मी-रवळनाथ, श्री शांतादुर्गा सातेरी, श्री भूतनाथ आणि प्रतिष्ठित देवता वेताळ (वेताळ-बाळ), श्री रूपेभगत, श्री महादेव, श्री नारायणदेव यांसारख्या लोकदेवतांना समर्पित असलेल्या अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
वेताळ मंदिराच्या शेजारीच निळा काळा, केळबाय किंवा गजलक्ष्मी म्हणतात तिथे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे पुरातन गोमंतकीय स्थापत्यशैलीची उत्तम उदाहरणे आहेत. येथे एक प्रचलित म्हण आहे - ‘मावकया ना घेव आणि वेताळांत ना बायल’.
खाडी असल्याने मासेमारीचा व्यवसाय आजही या भागात मोठ्या प्रमाणात केला जातो. पूर्वीच्या काळी भेंडीच्या झाडाचा वापर होड्या बनवण्यासाठी केला जायचा.
श्री भूतनाथाचे ठिकाण तारीवाडा येथे खारफुटीच्या जंगलात आहे. तिथे एक भलामोठा दगड आहे, ज्याची भूतनाथ म्हणून पूजा केली जाते. जुन्या फेरीच्या धक्काजवळ किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. श्री ब्रम्हो देवसामोर आमोण्यातील गडे उत्सव साजरा केला जातो, यावेळी नमन म्हटले जाते. २४ योगिनींच्या संदर्भात उल्लेख या नमनात येतो.
आमोणा हे केवळ खाणी आणि उद्योगांचे गाव नाही तर गोव्याच्या उत्सवांचे आणि संस्कृतीचे जणू काही संग्रहालय आहे. येथे निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. मांडवीच्या खोऱ्यातील सुपीकता, किल्ल्याचे अवशेष सांगणारा राजकीय इतिहास, आणि शांतादुर्गा ते वेताळ-बाबांपर्यंतची लोकदेवतांची अखंड परंपरा ही आमोण्याची खरी ओळख आहे.
फुलांचो खेळ, घुमाचा नाद आणि आमोणे येथे दोन वेळा दसरा साजरा केला जातो. श्री रवळनाथ आणि श्री महालक्ष्मी मंदिरात आश्विन महिन्यात नवरात्र आणि दसरा उत्सव साजरा करतात. मात्र, येथील वेताळ मंदिरात कार्तिक महिन्यात वद्य पंचमीपासून नवरात्राला सुरुवात होते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच वद्य चतुर्दशीला दसऱ्याचा कार्यक्रम होतो. या दसऱ्याची खूप ख्याती आहे आणि त्याला 'आमोणेचो दसरो' म्हणून ओळखतात.
आमोण्याचा दसरा हा केवळ उत्सव किंवा धार्मिक विधी नसून, गावाच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक सात्यत्याचे प्रतीक आहेत. विकासाच्या नावाखाली जैवविविधता आणि वारसा पुसला जात असताना, आमोणा सारखी गावे आपल्याला आठवण करून देतात की खरी समृद्धी ही जमिनीत, लोककथांमध्ये आणि परंपरेच्या जतनात आहे. ही परिक्रमा म्हणजे आमोणे गावच्या भूतकाळाला समजून घेऊन त्याच्या शाश्वत भविष्याकडे पाहण्याची एक दृष्टी आहे.
श्री शांतादुर्गा सातेरीचे डोंगरावरील मंदिर एकेकाळी वारुळाच्या रूपात येथील जंगलात पूजले जायचे. काही कालानंतर येथील देवीची मूर्ती चतुर्भुज होती. एका हातात गदा, दुसऱ्या हातात चक्र, तिसरा हात अभय मुद्रेत आणि चौथा हात वरद मुद्रेत. आजची नवीन मूर्ती एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू घेऊन दिसते. वैष्णव पंथापासून शैव पंथापर्यंतचा हा बदल आपल्याला मूर्तीत पाहायला मिळतो. देवी शांतादुर्गा कळस महादेवाच्या मंदिरात नेला जातो. त्यामुळे तिचा शिवाशी असलेला संबंध लक्षात येतो. दरवर्षी हा कळस एका रात्रीसाठी शांतादुर्गाच्या देवळात आणला जातो.
वेताळाला देशातील विविध जाती-जमातींची देवता मानले जाते. राज्यात सर्वात प्राचीन वसाहतकर असलेल्या गौड जमातीकडून या देवतेची पूजा केली जात असे. त्यानंतर १० ते १३ व्या शतकादरम्यान नाथ पंथीयांनी तिला आत्मसात केले. वेताळ ही भगवान शिवाचे एक रूप असून मूर्ती उघड्या स्थितीत, योद्ध्याच्या रूपात आहे. त्यांना आमोण्याची ग्रामदेवता मानले जाते. श्री वेताळाची जुनी मूर्ती चांफ्याच्या लाकडाची होती, तर आज जी मूर्ती मंदिरात दिसते, ती पंचधातूची आहे.
त्यावेळी मंदिरात महिला दिवे (दिवजा) लावून उत्सव साजरा करतात. या मंदिराचे महाजन गौड सारस्वत ब्राह्मण आमोणकर तसेच पडते, गावस, सिनारी, प्रभू ही मंडळी आहेत.
राज्याच्या सामाजिक-धार्मिक परंपरेत श्री रवळनाथ यांना क्षेत्रपाल आणि ग्रामदेवता म्हणून अत्यंत पूजनीय मानले जाते. आख्यायिकेनुसार विनाशकारी राक्षसांविरुद्ध लढण्यासाठी रवळनाथाचा जन्म झाला आणि देवी महालक्ष्मीने त्यांना दिव्य योद्धा म्हणून कार्य करण्याचा आदेश दिला. या मंदिराच्या आवारात एक विहीर आहे, जिथे पाणी कुत्रा किंवा श्वापद जनावर चावल्यास औषध म्हणून दिले जाते, अशी श्रद्धा आहे.
येथील रूपोभगत हा देव श्री रवळनाथ-महालक्ष्मीच्या मंदिराजवळच्या मंदिरात आहे. संकट दूर करण्यासाठी तसेच ठरवलेली कोणतीही वस्तू परत मिळवून देण्यासाठी प्रार्थना करतात आणि त्याबदल्यात गूळ नवस म्हणून चढवतात. हा देव नवसाला पावतो, अशी आख्यायिका आहे.