जालना : माहेरवाशीण असलेल्या गौराईचे श्रींच्या पाठोपाठ येत्या १७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात आगमन होणार आहे. बाप्पांच्या आगमनामुळे जिल्हाभरात आनंद आहे. हा आनंद द्विगुणित होऊन घराघरात चैतन्य पसरणार आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे गौराईचे दुष्काळातच आगमन होत आहे. मुखवटे, मूर्ती आदींसह पुजेच्या साहित्य दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे महालक्ष्मी आगमनाला देखील दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. शिवाय, दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता नाकारतायेत आहे.
दरम्यान, या गौराई पृथ्वीतलावर आपल्या माहेरपणाला येतात असे मानले जाते. गौरी आगमन,पूजन आणि विसर्जन असे तीन दिवस गौराईचा उत्सव साजरा केला जातो. घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवत मुखवटे घरात आणले जातात. घंटेचा किंवा ताट-चमचा वाजवून मंगल आवाजात गौराईचे स्वागत केले जाते.
गौराई ही साक्षात देवी पार्वती आणि महालक्ष्मीचे रूप असून ती तीन दिवसांसाठी आपल्या माहेरी येते. यंदा गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी गौराईचे घराघरांत थाटामाटात आगमन होणार आहे. पहिला दिवस दारापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवून, ताट-चमचा किंवा घंटेच्या गजरात "गौराई आली, आनंदाने घरी आली, सुख-समृद्धी सोबत घेऊन आली" असे म्हणत देवीचे स्वागत केले जाते.
दुसरा दिवस या दिवशी महालक्ष्मीची षोडशोपचार पूजा केली जाते. पारंपरिक पोशाख परिधान करून पुरणपोळी आणि मोदकांचा विशेष नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी महिलांसाठी हळदी-कुंकवाचे खास आयोजन केले जाते.
१९ सप्टेंबरला गौराईला निरोप
तीन दिवसांचे माहेरपण संपवून भाविक जड अंतःकरणाने आणि भक्तिमय वातावरणात गौराईला निरोप देतात. गौराईचे आगमन भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करून सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते, अशी दृढ श्रद्धा आहे. या उत्सवाच्या निमित्ताने नातेवाईक आणि शेजारी एकत्र येतात, ज्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक बंध अधिक घट्ट होतात. यंदाही या उत्सवासाठी घराघरांत विशेष सजावट, रांगोळ्या आणि दिव्यांची आरास करण्याची तयारी सुरू झाली आहे.
असा आहे भाव
मुखवटे ५०० ते दीड हजार
रेडिमेड महालक्ष्मी २ ते ४ हजार
मखर ४ हजार ते १० हजार
कोठ्या १५०० ते २२००