पिंपरी: रिक्षाचा कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादात सराईत गुंडाने मध्यस्थी करून धमकी दिली. याचा राग मानत धरून पाच जणांनी मिळून सराईत गुन्हेगार समजून त्याच्या भावावर गोळीबार केला. ही घटना 2 जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली.
राहुल बाबासाहेब फलके (28, रा. महाळुंगे, ता. खेड), अंकित अर्जुन थोरात (28, रा. चाडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वैभव अरुण गायकवाड यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून रोजी सायंकाळी महाळुंगे येथील सराईत गुंड अजय अरुण गायकवाड याचा मित्र संभाजी मोहन यमुनवाड याने रिक्षाचा कट मारल्याच्या वादातून सोन्या जावळे आणि राहुल फलके यांना मारहाण केली. त्यामुळे राहुल फलके याच्या ग्रुपने अजय गायकवाड याला अद्दल घडवण्याचे ठरवले.
दरम्यान, 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता गुंड अजय गायकवाड हा वापरत असलेल्या कार मधून त्याचा भाऊ वैभव गायकवाड घरी जात होता. त्यावेळी राहुल फलके आणि त्याच्या साथीदारांनी वैभव याला अजय समजून त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी कारच्या मागून येत असलेल्या संभाजी यमुनवाड याने वैभ्या पळ असा आवाज दिला. त्यामुळे हल्लेखोरांना आपण ज्याच्यावर गोळीबार केला आहे, तो अजय गायकवाड नसल्याचे समजले. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली. उपनिरीक्षक विलास गोसावी आणि त्यांच्या पथकाने खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथून राहुल आणि अंकित या दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य तिघांचा शोध पोलिस घेत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलिस अंमलदार गोरक थेऊरकर, राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, किशोर सांगळे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे यांनी केली.
https://youtu.be/IYYU1mogoqk