Relationship Tips
नवी दिल्ली: दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्ती एकमेकांकडे लवकर आकर्षित होतात, हे चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. पण, खऱ्या आयुष्यात मात्र वेगळच आहे. एका नव्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्तींचे स्वभाव, विचार आणि सवयी एकमेकांशी जुळतात, त्यांचे नाते अधिक काळ टिकते आणि ते अधिक सुखी असतात.
कोलोरॅडो युनिव्हर्सिटीने गेल्या शंभर वर्षांतील लाखो जोडप्यांच्या १३० पेक्षा जास्त वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले. या अभ्यासानुसार, सुमारे ८२ ते ८९ टक्के प्रकरणांमध्ये जोडीदारांचे स्वभाव आणि विचार एकमेकांशी समान असल्याचे आढळले. मग ती राजकीय विचारधारा असो किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, बहुतांश जोडप्यांमध्ये समानता दिसून आली. याउलट म्हणजे केवळ ३ टक्के प्रकरणांमध्ये भिन्न स्वभाव असलेले जोडीदार एकत्र असल्याचे दिसून आले.
युनिव्हर्सिटी ऑफ मिसूरीच्या संशोधकांच्या मते, विरुद्ध स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला आकर्षण असू शकते, परंतु दीर्घकाळ नाते टिकवण्यासाठी ते पुरेसे नसते. लोक अनेकदा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जोडीदाराची अपेक्षा करतात, मात्र प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते तेव्हा ते अशाच व्यक्तीची निवड करतात ज्यांचे आकर्षण मूल्य आणि सवयी त्यांच्या स्वतः सोबत जुळणाऱ्या असतील.
संशोधकांनी नात्यात समानता असण्याचे काही मुख्य फायदे सांगितले आहेत. समान स्वभाव असल्यास जोडीदारांमध्ये सुसंवाद साधणे सोपे जाते. एकसारखे विचार असणाऱ्या जोडप्यांमध्ये कमी वाद असतात. समान जीवनमूल्ये असलेल्या व्यक्तींचे नाते दीर्घकाळ टिकते. म्हणजेच आपण नकळतपणे अशाच जोडीदाराची निवड करतो जो आपल्यासारखा असेल. मग त्या सवयी असोत किंवा संस्कार. हेच सुखी नात्याचा खरा पाया असतो.