Premanand Maharaj file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Premanand Maharaj: मन सतत अस्वस्थ असते का? प्रेमानंद महाराजांनी सांगितला मनावर नियंत्रण मिळवण्याचा सोपा उपाय

मन सतत अस्वस्थ, नकारात्मक विचार किंवा चुकीच्या इच्छांच्या आहारी जाणे हे अनेकांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या आहेत. यावर उपाय आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा नियम प्रेमानंद महाराजांनी सांगितला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Premanand Maharaj

नवी दिल्ली : मन सतत अस्वस्थ राहणे, नकारात्मक विचार येणे किंवा चुकीच्या इच्छांच्या आहारी जाणे हे अनेकांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या मते, मनाच्या प्रत्येक इच्छेच्या मागे अंधपणे न धावता योग्य-अयोग्य याचा विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. प्रेम आणि नियंत्रण या दोन्हींचा समतोल साधल्यास मनावर सहज नियंत्रण मिळवता येते आणि जीवन अधिक आनंदी व संतुलित बनते.

प्रेमानंद महाराज सांगतात की, आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांचे मूळ कारण म्हणजे मनाच्या प्रत्येक इच्छेचे अंधानुकरण करणे. मन सतत विविध प्रकारच्या इच्छा निर्माण करत असते. त्यामुळे त्याला योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा चुकीच्या आचरणामुळे जीवनात अडचणी आणि दुर्दैव ओढवू शकते.

फक्त कठोरपणा पुरेसा नाही

अनेकांना वाटते की मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःला घाबरवणे किंवा इच्छांना दाबून टाकणे हा योग्य मार्ग आहे. मात्र, प्रेमानंद महाराज यांच्या मते हा दृष्टिकोन चुकीचा आहे. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोरपणाबरोबरच प्रेमाचीही गरज असते. जसे एखाद्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी प्रेम आणि शिस्त या दोन्हींची आवश्यकता असते, तसेच मनालाही योग्य मार्गावर आणण्यासाठी हा समतोल महत्त्वाचा आहे.

योग्य इच्छांचा स्वीकार करा

प्रेमानंद महाराज सांगतात की, मनातील प्रत्येक इच्छा चुकीची नसते. जर एखादी इच्छा नैतिक, योग्य आणि धर्माच्या विरोधात नसलेली असेल, तर ती आनंदाने पूर्ण करण्यात काहीच गैर नाही. यासाठी ते एक साधे उदाहरण देतात. समजा, तुमच्या मनात रसगुल्ला खाण्याची इच्छा झाली. अशावेळी स्वतःला तीन प्रश्न विचारा, ही इच्छा चुकीची आहे का? ती धर्म किंवा नैतिकतेच्या विरोधात आहे का? यामुळे कोणते पाप किंवा नुकसान होणार आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी असतील, तर ती इच्छा पूर्ण करण्यास हरकत नाही आणि त्याचा आनंद घ्यावा.

वाईट इच्छांवर मात्र नियंत्रण आवश्यक

मनाचा दुसरा पैलू असा असतो की ते कधी कधी चुकीची कृत्ये करण्यास किंवा अयोग्य गोष्टींकडे आकर्षित होण्यास प्रवृत्त करते. प्रेमानंद महाराज यांच्या मते, अशा नकारात्मक इच्छांमुळे अनेकजण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम भोगतात. त्यामुळे अशा वेळी मनाचे ऐकण्याऐवजी त्यावर ठामपणे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

मनावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा नियम

प्रेमानंद महाराज यांच्या मते, मनावर नियंत्रण ठेवण्याचा नियम अत्यंत सोपा आहे. इच्छा योग्य, नैतिक आणि धर्मसंगत असेल, तर ती आनंदाने स्वीकारा. इच्छा चुकीची, अनैतिक किंवा अहितकारक असेल, तर कोणतीही तडजोड न करता तिला नकार द्या. त्यांच्या मते, प्रेम आणि नियंत्रण यांचा योग्य समतोल साधला, तर मन हळूहळू आपला शत्रू न राहता सर्वात मोठा मित्र बनते आणि जीवन अधिक शांत, समाधानी व सकारात्मक होण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT