Bhagavad Gita Pinterest
ज्योतिष आणि धार्मिक

How to Stop Negative Thoughts: नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसे मिळवावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला होता हा सल्ला!

Bhagavad gita wisdom How to Control Overthinking: मनावरील नियंत्रणासाठी भगवद्गीतेतील ५ महत्त्वपूर्ण संदेश सांगितल आहेत.

मोहन कारंडे
श्रीमद्भगवद्गीतेतील आत्मतत्त्व

Bhagavad gita wisdom

अतिविचार आणि नकारात्मक विचार ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. मनात येणारे लहान-सहान विचार कधी मोठ्या मानसिक तणावात बदलतात, हे समजूनही येत नाही. यामुळे मानसिक शांतता आणि झोप उडते. महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर अर्जुनही अशाच प्रकारे संभ्रम, भीती आणि अतिविचारांमुळे हतबल झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शस्त्र नव्हे, तर 'गीते'च्या रूपाने ज्ञानाचे अमृत दिले. मनावरील नियंत्रणासाठी भगवद्गीतेतील ५ महत्त्वपूर्ण संदेश खालीलप्रमाणे आहेत:

१. मनाची चंचलता आधी स्वीकारा

bhagavad gita

गीतेच्या सहाव्या अध्यायातील ३४ व्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो, "हे कृष्णा, हे मन अत्यंत चंचल, मंथन करणारे, बलवान आणि हट्टी आहे. त्याला रोखणे म्हणजे वाऱ्याला हाताने धरण्यासारखे कठीण आहे."

अतिविचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आज नेमकी हीच स्थिती आहे. यावर श्रीकृष्ण अर्जुनाचा संघर्ष फेटाळून लावत नाही, तर मनाची चंचलता मान्य करतो. मात्र, 'अभ्यास' आणि 'वैराग्य' याद्वारे मनाला शिस्त लावता येऊ शकते, अशी ग्वाहीही श्रीकृष्ण देतो. मन हा एक स्नायू सारखा आहे, सरावाने तो मजबूत करता येतो.

२. 'अनासक्ती'चा सराव करा, 'उदासीनतेचा' नव्हे

bhagavad gita

गीतेतील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' (अध्याय २, श्लोक ४७). म्हणजेच, "तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळावर नाही."

आपण जेव्हा फळाची किंवा भविष्याचा अतिविचार करतो "मी अपयशी झालो तर?", "लोकांना मी आवडलो नाही तर?" तेव्हाच खऱ्या अर्थाने मानसिक तणाव वाढतो. श्रीकृष्ण सांगतात की, तुमचे काम सर्वोत्तम करा, पण परिणामाच्या चिंतेत गुंतून राहू नका.

३. वर्तमानकाळात जगण्यावर लक्ष केंद्रीत करा (कर्मयोग)

श्रीकृष्णाने गीतेत 'कर्मयोगा'वर म्हणजेच निष्काम कर्म करण्यावर भर दिला आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही जे काम करत आहात, त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या.

जेव्हा माणूस रिकामा बसतो किंवा एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अतिविचार वाढतो. याउलट, चालू क्षणावर लक्ष केंद्रित केल्यास मनाला इकडेतिकडे भरकटायला जागाच उरत नाही. वर्तमानकाळात जगणे हेच एक प्रकारे चालते-बोलते ध्यान आहे.

४. मनःस्थितीतील 'द्वंद्वा'च्या पलीकडे जा

दुसऱ्या अध्यायातील ३८ व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, "सुख-दुःख, लाभ-हानि आणि जय-पराजय यांना समान मानून युद्धासाठी सज्ज हो."

आपले मन प्रत्येक गोष्टीला 'चांगले' किंवा 'वाईट' असे लेबल लावते आणि तिथूनच नकारात्मक विचारांचा प्रवास सुरू होतो. श्रीकृष्ण आपल्याला या भावनांच्या चढ-उतारांवर मात करण्याचा सल्ला देतात. जेव्हा मनात नकारात्मक विचार येईल, तेव्हा त्याला प्रतिक्रिया देण्याऐवजी त्रयस्थपणे त्याचे निरीक्षण करा. विचारांच्या प्रवाहात वाहून जाऊ नका.

५. ध्यान

मनाला शिस्त लावण्यासाठी गीतेत 'ध्यानयोगा'चे महत्त्व सांगितले आहे. "माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. मन हाच माणसाचा मित्र आहे आणि मन हाच शत्रू आहे," (अध्याय ६, श्लोक ५).

नियमित ध्यान केल्याने माणूस आणि त्याचे विचार यांच्यात एक अंतर निर्माण होते. हे अंतर माणसाला विचारांच्या आहारी जाण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. रोज किमान १० मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान केल्यास मनाचा वेग मंदावतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT