Kalyug Age
नवी दिल्ली: हिंदू धर्मातील कालगणना प्रामुख्याने सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलयुग अशा चार युगांमध्ये विभागली गेली आहे. या चारही युगांना एकत्र 'महायुग' म्हटले जाते. सध्या सुरू असलेले कलयुग हे या चक्रातील शेवटचे आणि नैतिकदृष्ट्या सर्वात कमकुवत युग मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, महाभारत युद्धानंतर साधारणपणे इसवी सन पूर्व ३१०२ मध्ये कलयुगाची सुरुवात झाली. या हिशोबाने विचार केला, तर कलयुगाचा आता कुठे अत्यंत छोटासा टप्पा पार पडला असून, त्याचा एक मोठा कालखंड अजूनही शिल्लक आहे. मात्र, या कलयुगाच्या नेमक्या आयुष्याबाबत पौराणिक ग्रंथांमध्ये आणि विद्वानांमध्ये विविध मतप्रवाह पाहायला मिळतात.
पारंपरिक आणि सर्वात जास्त मानल्या जाणाऱ्या गणनेनुसार, चारही युगांचा कालखंड हा लाखो वर्षांचा आहे. यामध्ये सतयुग १७,२८,००० वर्षे, त्रेतायुग १२,९६,००० वर्षे, द्वापरयुग ८,६४,००० वर्षे आणि कलयुगाचे आयुष्य ४,३२,००० वर्षे इतके सांगण्यात आले आहे. या चक्रानुसार कलयुग हे अत्यंत प्रदीर्घ असून, या काळात जसजसा वेळ पुढे जाईल, तसतसा धर्म आणि नैतिकतेचा ऱ्हास होत जाईल, असे मानले जाते.
दुसऱ्या एका पौराणिक विचारप्रवाहामध्ये युगांचा हा कालखंड अतिशय लहान प्रमाणावर स्पष्ट करण्यात आला आहे. या मतानुसार, प्रत्येक युगाचा कालावधी हा केवळ १२५० वर्षांचा असतो. त्यानुसार चारही युगांचे एक चक्र अवघ्या ५००० वर्षांत पूर्ण होते. या दृष्टिकोनातून युगांकडे एक 'प्रतीकात्मक बदल' म्हणून पाहिले जाते, जिथे कालानुरूप होणारे सामाजिक बदल तुलनेने वेगाने घडतात.
याशिवाय, परमहंस राजनारायण जी यांच्यासारख्या काही विद्वानांनी युगांची एक वेगळीच मांडणी केली आहे. त्यांच्या मते सतयुग १२०० वर्षे, त्रेता २४०० वर्षे, द्वापर ३६०० वर्षे आणि कलयुग ४८०० वर्षांचे असते. या विचारसरणीत युगांची गणना देवांच्या काळाशी न जोडता, मानवी इतिहास आणि व्यावहारिक दृष्टीकोनावर आधारित करण्यात आली आहे.
वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, 'युग' या शब्दाचा अर्थ नेहमीच लाखों वर्षांचा कालखंड असा नव्हता. अनेक ठिकाणी हा शब्द केवळ एक ठराविक काळ किंवा दिवस-रात्र या अर्थानेही वापरला गेला आहे. दुसरीकडे, ज्योतिष आणि खगोलशास्त्रानुसार, पृथ्वीला संपूर्ण राशीचक्राची एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारणपणे २५,९२० वर्षे लागतात; काही विद्वान या खगोलीय घटनेलाच 'युगचक्र' मानतात. यावरून, वेगवेगळ्या कालखंडात आणि विद्वानांनुसार युगाची व्याख्या बदलत गेल्याचे स्पष्ट होते.
हिंदू धर्मातील पौराणीक कथानुसार, जेव्हा कलयुगात पाप, अधर्म, असत्य आणि अन्याय पराकोटीला पोहोचेल, तेव्हा जगाच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंचा अंतिम म्हणजेच 'कल्कि अवतार' होईल. कलयुगाच्या समाप्तीसाठी भगवान कल्कि हे पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन, हातात तलवार घेऊन प्रकट होतील आणि पृथ्वीवरील सर्व अधर्माचा नाश करतील, अशी मान्यता आहे. त्यांच्या आगमनासोबतच कलयुगाचा अंत होईल आणि पुन्हा एकदा 'सत्य व धर्माचे' प्रतीक असलेल्या 'सतयुगा'ची सुरूवात होईल.