Holashtak Holi puja vidhi file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Holashtak 2026: आजपासून होलाष्टक सुरू! पुढचे ८ दिवस चुकूनही करू नका 'ही' कामे; जाणून घ्या काय आहे कारण...

Holashtak Holi puja vidhi: होलाष्टक मंगळवार, २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. होलाष्टक म्हणजे होळीपूर्वीचे ८ दिवस, ज्यांना हिंदू धर्मात विशेष स्थान दिले गेले आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले जाते.

मोहन कारंडे

Holashtak Holi puja vidhi 2026:

मुंबई: होलाष्टक मंगळवार, २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. होलाष्टक म्हणजे होळीपूर्वीचे ८ दिवस, ज्यांना हिंदू धर्मात विशेष स्थान दिले गेले आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले जाते. दरम्यान, होलिका दहनानंतर पुन्हा सर्व शुभ आणि मांगल कार्ये सुरू होतात. फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होते आणि फाल्गुन पौर्णिमेला संपते. हा काळ अशुभ मानण्यामागे एक पौराणिक कथा आहे. तसेच, या ८ दिवसांत काही गोष्टी करणे शुभही मानले जाते. होलाष्टकात काय करावे आणि काय करू नये, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

होलाष्टकात काय करू नये?

  • सोळा संस्कार: मान्यतेनुसार, होलाष्टकाच्या काळात साखरपुडा, नामकरण, विवाह, मुंज यांसारखे १६ संस्कार करू नयेत, कारण या काळात कोणत्याही शुभ कार्याची मनाई असते.

  • खरेदी टाळा: या ८ दिवसांच्या कालावधीत नवीन वाहन, मालमत्ता, घर इत्यादी खरेदी करणे टाळावे. होलाष्टकात या गोष्टी करणे शुभ मानले जात नाही.

  • नवीन व्यवसाय: होलाष्टकादरम्यान ग्रह उग्र असतात. अशा स्थितीत नवीन व्यवसाय सुरू करू नये. तसे केल्यास ग्रहांच्या उग्रतेचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो.

  • गृहनिर्माण आणि गृहप्रवेश: जर तुम्ही घर बांधण्याचा विचार करत असाल, तर होलिका दहनापर्यंत थांबा. होलाष्टकात नवीन घराचे बांधकाम किंवा गृहप्रवेश करू नये, अशी मान्यता आहे.

  • नोकरी बदलणे: ज्योतिषशास्त्रानुसार, होलाष्टकात नोकरी बदलणे टाळावे. शक्य असल्यास नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी होलाष्टकापूर्वीचा किंवा नंतरचा काळ निवडावा. मात्र, नोकरी बदलणे अनिवार्य असेल, तर तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घ्यावा.

  • हवन आणि यज्ञ: होलाष्टकादरम्यान हवन किंवा यज्ञ करणे वर्जित आहे. असे केल्याने प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

होलाष्टकात काय करावे?

  • जप आणि ध्यान: या ८ दिवसांत जप, तप आणि ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. त्यामुळे या काळात देवाची विधिवत पूजा करावी.

  • विष्णू भक्ती: भक्त प्रल्हादाची भगवान विष्णूंवर अढळ श्रद्धा होती. त्यामुळे होलाष्टकात विष्णूंची पूजा करण्यासोबतच 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.

  • शिव आराधना: या काळात भगवान शंकराची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे भक्तांवर महादेवाची कृपा राहते. तुम्ही 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करू शकता.

  • ग्रहांची शांती: उग्र ग्रहांच्या शांतीसाठी ज्योतिषाचा सल्ला घेऊन उपाय करता येतात. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते.

होलाष्टक अशुभ का मानले जाते?

यामागे एक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, प्राचीन काळी भगवान शंकरांनी क्रोधात येऊन कामदेवाला भस्म केले होते. यामुळे संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडले. असे मानले जाते की, या ८ दिवसांत सर्व ग्रह उग्र स्थितीत आले होते. तेव्हापासून होलाष्टकाची परंपरा सुरू झाली. या काळात शुभ कार्ये केल्यास उग्र ग्रहांचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धारणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT