India Fertilizer Supply Crisis Pudhari
अर्थभान

Fertilizer Imports: शेतकरी संकटात? मिडल ईस्ट तणावामुळे खत पुरवठ्यावर परिणाम; सरकारने घेतला मोठा निर्णय

India Fertilizer Supply Crisis: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे भारताने खत आयातीसाठी पर्यायी देशांकडे वळण्याची रणनीती आखली आहे. युरिया आणि DAP साठी मोरोक्को, बेलारूस, इंडोनेशिया, रशिया आणि चीन यांसारख्या देशांकडून आयात वाढवण्याची योजना आहे.

Rahul Shelke

India Fertilizer Supply Crisis: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या खत पुरवठ्यावरही होऊ लागला आहे. त्यामुळे भारत सरकार आता खत आयातीसाठी पर्यायी देशांचा विचार करत आहे. विशेषतः युरिया आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) यांसारख्या महत्त्वाच्या खतांसाठी भारत आता मोरोक्को, बेलारूस, इंडोनेशिया, रशिया आणि चीन यांसारख्या देशांकडून आयात वाढवण्याचा विचार करत आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या युरिया आयातदारांपैकी एक असून कृषी क्षेत्रासाठी खतांचा पुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र पश्चिम आशियातील तणाव आणि संभाव्य समुद्री नाकाबंदीमुळे पारंपरिक पुरवठा मार्गांवर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः होर्मुज सामुद्रधुनी हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, कारण सुमारे 70 टक्के युरिया आयात याच मार्गाने भारतात पोहोचते.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात रशिया आणि चीन हे भारतासाठी युरियाचे प्रमुख पुरवठादार बनले आहेत. भविष्यात या देशांकडून आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण भू-राजकीय अस्थिरतेमुळे एका देशावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

खत उद्योग संघटनांच्या मते, आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारे खतांच्या पुरवठ्याबाबत समन्वय साधत आहेत. फॉस्फेटिक खतांसाठी भारताने आधीच विविध देशांसोबत दीर्घकालीन करार केले आहेत. मोरोक्को, जॉर्डन, सौदी अरेबिया, रशिया आणि बेलारूस यांसारख्या देशांकडून पुरवठा होत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भारताच्या खत उद्योगाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नैसर्गिक वायूवर असलेले अवलंबित्व. युरिया निर्मितीसाठी नैसर्गिक वायू हा मुख्य कच्चा माल आहे. सध्या खत उद्योगासाठी देशातील नैसर्गिक वायूचा सुमारे 30 टक्के हिस्सा लागतो. मात्र शहरांमधील गॅस वितरणाला प्राधान्य देण्याच्या सरकारी धोरणामुळे देशांतर्गत युरिया उत्पादनावर दबाव आला आहे.

याच पार्श्वभूमीवर भारताने एलएनजी आयातीचे स्रोतही वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांकडून एलएनजी आयात वाढवण्याचा पर्यायही विचारात आहे. तज्ज्ञांच्या मते, काही देशांवर अवलंबून राहण्याऐवजी विविध देशांकडून पुरवठा मिळवणे आवश्यक आहे.

मागील आर्थिक वर्षातील आकडेवारी पाहिली तर भारताने आयात केलेल्या 5.64 दशलक्ष टन युरियापैकी जवळपास 70 टक्के पुरवठा ओमान, सौदी अरेबिया, यूएई आणि बहरीन या देशांकडून झाला होता. त्यात ओमान हा सर्वात मोठा पुरवठादार होता. DAP खतांच्या बाबतीतही सौदी अरेबियाचा मोठा वाटा होता.

दरम्यान, सरकारच्या मते सध्या देशात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की DAP आणि NPK खतांचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. खरीप हंगामाची मागणी वाढण्यापूर्वी देशात पुरेसा साठा ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक खत पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भारताने आयातीचे स्रोत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राला स्थिर पुरवठा करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT