War Impact on Markets
गत सप्ताहात भारतीय भांडवल बाजारावर भूराजकीय तणावाचे पडसाद पाहायला मिळाले. सप्ताहभरात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण ३३८.७० अंक व १०४७.५२ अंकांची घट होऊन दोन्ही निर्देशांक २४००८ अंक, तसेच ७९४५४.४७ अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये १.३९ टक्के तर सेन्सेक्समध्ये १.३ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सर्वाधिक घट होणाऱ्या समभागांमध्ये सनफार्मा (-४.६ टक्के), एशियन पेंटस् (-४.६ टक्के), इंडसिंड बैंक (-४.१ टक्के), जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (-४ टक्के), एनटीपीसी (-३.९ टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. त्याचप्रमाणे सप्ताहभरात सर्वाधिक वाढ होणाऱ्या समभागांमध्ये टाटा मोटर्स (८.७ टक्के), टायटन कंपनी (५.१ टक्के), लार्सन अँड टूबो (३.४ टक्के), अदानी पोर्टस् (३.१ टक्के), हिरोमोटोकॉर्प (३ टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला. भारत-पाकिस्तान युद्धाचा भारतीय भांडवल बाजारावर अर्थातच काहीसा नकारात्मक परिणाम झाला. परंतु, इंग्लंडसोबतचा व्यापार करार, अमेरिकेच्या सोबत चालू असणाऱ्या रेसिप्रोकल टॅक्स संदर्भात सकारात्मक वाटाघाटी आणि युद्धामध्ये काही अपवादात्मक देश वगळता उरलेल्या जगाने भारताला दिलेला पाठिंबा यामुळे भारतीय भांडवल बाजाराची घसरण मर्यादित राहिली.
पाकिस्तानचा कराची स्टॉक एक्स्चेंज (केएसई १००) पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. गुरुवारच्या सत्रात तर एकाच दिवशी निर्देशांक ६ टक्क्यांपर्यंत कोसळल्याने पाकिस्तानी स्टॉक एक्स्चेंजचे व्यवहार काही काळासाठी थांबवण्याची नामुष्की ओढवली. चार दिवसांत हा निर्देशांक ९.५ टक्क्यांपर्यंत आपटला. पहलगाम हल्ल्यानंतर केएसई १०० या पाकिस्तानच्या निर्देशांकामध्ये १२.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. पाकिस्तानवर सध्या १३१ अब्ज डॉलर्सचे विदेशी कर्ज असून, विदेश चलन गंगाजळी फक्त १५ अब्ज डॉलर्स बाकी आहे. सध्या पाकिस्तान 'आयएमएफ' (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कडून मिळालेल्या उसनवारीवर जगत आहे. १९५० साली या संस्थेचा सदस्य झाल्यापासून या देशाने तब्बल २५ वेळा कर्ज उचलले आहे. तसेच जागतिक बँकेकडून ४८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतलेले आहेच. युद्ध लांबल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था पूर्णतः दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असल्याचे अर्थविश्लेषकांचे मत.
भूराजकीय युद्धात सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचे भारतीय वित्त संस्था आणि आस्थापनांवर सायबर हल्ले, रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय बँकांना आपले डिजिटल व आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचे आदेश दिले. केंद्रीय वित्तीय सेवा विभागने सर्व 'एटीएम'मध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व बँकांना दिले. त्याचप्रमाणे 'एटीएम बंद राहणार' वगैरेसारख्या खोट्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले.
२०२५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताचा जीडीपी ४१८७.०१ अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे; तसेच जपानचा जीडीपी ४१८६.४३ अब्ज डॉलर्स राहण्याचा अंदाज आहे. पुढील दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ५००० अब्ज डॉलर्स म्हणजेच ५ ट्रिलियन डॉलर्सची बनण्याचा कयास लावण्यात येत आहे. २०२८ पर्यंत जर्मनीला मागे टाकून भारत ही अमेरिका आणि चीन नंतरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा अंदाज 'आयएमएफ'च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
अस्थिरतेच्या वातावरणातदेखील म्युच्युअल फंड एसआयपीचा नवा विक्रम. एप्रिल महिन्यात 'एसआयपी'द्वारे तब्बल २६,६३१ कोटींची गुंतवणूक. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी मासिक गुंतवणूक ठरली. म्युच्युअल फंड उद्योगाचे व्यवस्थापन अंतर्गत भांडवल मूल्य (एयूएम) तब्बल ७० लाख कोटींवर पोहोचले. यावरून युद्धजन्य स्थितीतदेखील गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास प्रतीत होतो.
अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी 'एस अँड टी'चे गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल २५ टक्के वधारून ५४९७ कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूलदेखील १०.९ टक्के वधारून ६७०७९ कोटींवरून ७४३९२ कोटींवर पोहोचला.
देशातील सर्वात मोठी रंग उत्पादक कंपनी 'एशियन पेंटस्'चा निव्वळ नफा गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत तब्बल ४५ टक्के घटून ६९२.१३ कोटींपर्यंत खाली आला. कंपनीचा महसूलदेखील ४.३ टक्के घटून ८३५९ कोटींपर्यंत खाली आला.
भारत आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक असा मुक्त व्यापार करार करण्यात आला. २०३० पर्यंत सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये असणारा ६० अब्ज डॉलर्सचा व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या व्यापार करारामुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील शुल्क कमी करण्यात येणार आहे. याचा फायदा भारतीय उद्योगांना होणार आहे. वाहन उत्पादकतेमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. परंतु, जागतिक बाजारपेठेत भारतीय वाहन उद्योगाचे स्थान मर्यादित आहे. या करारापश्चात वाहन उद्योग तसेच भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत वाव मिळेल.
जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधिशांपैकी एक वॉरेन बफे ९४ व्या वर्षी सेवानिवृत्त. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक 'बर्फशायर हॅथवे'च्या प्रमुखपदाची त्यांनी तब्बल ६० वर्षे धुरा वाहिली. त्यांच्या पश्चात अॅबेल ग्रेग कंपनीच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी सांभाळतील. सध्या बफे यांच्याकडे फोर्ब नियतकालिकाच्या माहितीनुसार १६८.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ओमाहा या अमेरिकेच्या शहरात होणाऱ्या गुंतवणूकदाराच्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली. या कंपनीमधील त्यांचा हिस्सा हा त्यांच्या पश्चात समाजकार्यासाठी दान करण्यात येणार आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार मागील दहा आर्थिक वर्षांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी परदेशी गुंतवणूकदारांच्या तुलनेत तब्बल ३.७ पटींनी अधिक गुंतवणूक केली. या कालावधीत स्थानिक गुंतवणूकदारांनी तब्बल १९५ अब्ज डॉलर्स गुंतवले, तर परदेशी गुंतवणूकदारांनी केवळ ५३ अब्ज डॉलर्स भारतीय भांडवल बाजारात गुंतवले. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने ग्राहक केंद्री (कॉन्झ्युमर गुडस्), खनिज तेल व नैसर्गिक वायू (ऑईल अँड गॅस), धातू (मेटल्स) या क्षेत्रांना प्राधान्य दिले, तर परदेशी गुंतवणूकदारांनी वित्तीय कंपन्या, खासगी बँका, गृहवित्त पुरवठा कंपन्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले.
शुक्रवारच्या सत्रात रुपया चलन डॉलरच्या तुलनेत २२ पैसे मजबूत होऊन ८५.३६ रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाले. गुरुवारच्या दिवशी रुपया डॉलरच्या तुलनेत ८१ पैसे कमकुवत झाला होता. मागील अडीच वर्षांतील ही सर्वात मोठी पडझड होती. परंतु, शुक्रवारच्या दिवशी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून रुपया सावरला.
सातत्याने आठ आठवडे वाढ दर्शवल्यानंतर २ मे अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश गंगाजळी २.०६ अब्ज डॉलर्सनी घटून ६८६.०६ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.