Why Stock Market Crash Today: भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच विक्रीचा जोर वाढला आणि काही मिनिटांतच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 7.5 लाख कोटी रुपयांची घट झाली. BSE Sensex आणि NIFTY 50 या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी पडझड झाल्याने बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं.
बुधवारी बाजारात जोरदार तेजी होती. मात्र गुरुवारी चित्र पूर्णपणे बदललं. BSE Sensex सुरुवातीलाच घसरणीसह उघडला आणि काही मिनिटांतच 1200 हून अधिक अंकांनी घसरला.
त्याचवेळी NIFTY 50 मध्येही मोठी विक्री झाली. निफ्टी 380 हून अधिक अंकांनी घसरत 24 हजारांच्या खाली पोहोचला. मोठ्या कंपन्यांपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सपर्यंत सर्वत्र लाल रंग दिसत होता.
शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात घसरले.
त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 7.5 लाख कोटी रुपयांची घट झाली. बाजारातील या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे.
या घसरणीमागे जागतिक तणाव मोठं कारण मानलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी संदर्भात कठोर भूमिका घेतल्यामुळे जागतिक बाजारात तणाव वाढला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर 121 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहेत.
भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती चिंतेची मानली जाते. तेलाच्या वाढत्या दरांमुळे महागाई वाढू शकते आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
अमेरिकन आणि आशियाई बाजारांमध्येही घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्रीही बाजारातील दबाव वाढवत आहे.
बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना घाबरून निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.