PM Modi Gold Purchase Appeal Pudhari
अर्थभान

PM Modi on Gold Purchase: '...तर सोनं खरेदी करू नका', PM मोदींचं देशवासीयांना आवाहन; नेमकं काय सांगितलं?

PM Modi Gold Purchase Appeal: मोदी यांनी गरज नसल्यास सोने खरेदी करू नका, तसेच अनावश्यक परदेश प्रवास आणि परदेशातील विवाह टाळण्याचे आवाहन केले.

Rahul Shelke

PM Modi Gold Purchase Appeal: भारताने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के GDP वाढ नोंदवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. याचवेळी त्यांनी ‘स्वदेशी’, ‘वोकल फॉर लोकल’ आणि आत्मनिर्भर भारताचा संदेश देत अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले. तसेच, गरज नसेल तर सोने खरेदी करू नका, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर करत भारताच्या दमदार आर्थिक वाढीवर भाष्य केले. जग युद्ध, संकटे आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा सामना करत असतानाही भारत वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

7.8 टक्के GDP वाढीबद्दल देशवासीयांचे अभिनंदन

पंतप्रधान मोदी यांनी 7.8 टक्के आर्थिक वाढीबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले. ही कामगिरी भारतीयांच्या संकल्पशक्ती, मेहनत आणि सामूहिक सामर्थ्याचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी म्हटले.

जग सध्या युद्ध आणि विविध संकटांनी वेढलेले आहे. अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असून, जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. 2020 मधील कोविड महामारीच्या काळापासून जगभरात स्थैर्याचे आव्हान कायम असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या प्रतिकूल परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींचा काँग्रेसवर निशाणा

GDPच्या आकडेवारीवरून पंतप्रधान मोदी यांनी देशातील नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही निशाणा साधला.

भारतामध्ये काही लोक निराशेच्या गर्तेत बुडाले असून, खोट्या गोष्टी पसरवून चारही बाजूंनी निराशा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत भारताने 7.8 टक्के आर्थिक वाढ साध्य केली असल्याचे त्यांनी सांगितले. आता हीच विकासाची गती कायम ठेवण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

सोने खरेदीबाबत मोदींचे आवाहन

आत्मनिर्भर भारतासाठी देशवासीयांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे मोदी यांनी सांगितले. ‘वोकल फॉर लोकल’चा मंत्र स्वीकारण्याचे आवाहन करत त्यांनी अनावश्यक खर्च टाळण्याचा संदेश दिला.

परदेशात पर्यटनासाठी जाण्याऐवजी भारतातील पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे. तसेच विवाहसोहळे परदेशात करण्याऐवजी भारतातच करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याच संदर्भात “गरज नसेल तर सोनेही खरेदी करू नये,” असे मोदी यांनी म्हटले. देशांतर्गत उत्पादन, व्यवसाय आणि सेवांना प्रोत्साहन दिल्यास भारताची आर्थिक ताकद आणखी वाढू शकते, असा त्यामागील संदेश आहे.

2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य

भारताने स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिक भर दिल्यास भविष्यात देश आणखी मजबूत होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची युवा पिढी विकसित भारताची जबाबदारी स्वीकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या पिढीने आपल्या मेहनतीत कोणतीही कमतरता ठेवू नये आणि देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

‘नीती योग्य, नियत साफ’

पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या धोरणांबाबतही विश्वास व्यक्त केला. “आमची नीती योग्य आहे आणि नियत साफ आहे,” असे त्यांनी म्हटले.

देशातील 140 कोटी नागरिकांची सामूहिक शक्ती भारताला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचे सांगत त्यांनी देशवासीयांना विकासाची ही गती कायम ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना दिसतात. रीलच्या माध्यमातून तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे या पोस्टमधून पुन्हा दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT