LPG Gas Shortage Pudhari
अर्थभान

LPG Gas Shortage: व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाला का? सरकारने दिले स्पष्टीकरण

LPG Shortage Maharashtra News: मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाल्याने राज्यात LPG टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या अफवा चुकीच्या असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Rahul Shelke

LPG Shortage Maharashtra News: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अनेक मेसेजमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा थांबवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने घरगुती एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी व्यावसायिक गॅस वितरणाच्या प्राधान्यक्रमात तात्पुरते बदल करण्यात येऊ शकतात, परंतु पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आलेला नाही.

दरम्यान, या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर होताना दिसत आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळण्यास उशीर आणि दरात झालेली १५० ते २०० रुपयांची वाढ यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. काही ठिकाणी गॅसचा साठा कमी होत असल्याने व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेल असोसिएशननेही सरकारकडे पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांनाही या परिस्थितीचा काही प्रमाणात फटका बसत आहे. पूर्वी सिलेंडर बुकिंग केल्यानंतर साधारण २४ तासांत मिळत असे; मात्र सध्या अनेक ठिकाणी ३ ते ५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. पुरवठ्यावर ताण वाढल्यामुळे गॅस वितरकांवरही कामाचा दबाव वाढला असून ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधन क्षेत्रावर दबाव वाढला आहे. त्याचा परिणाम आगामी काळात महागाईवरही होऊ शकतो, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजमुळे अनावश्यक भीती निर्माण होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. गॅस सिलेंडरचा अनावश्यक साठा करू नये आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन शासनाने नागरिकांना केले आहे.

एकूणच, पुरवठा साखळीवर काही प्रमाणात ताण असला तरी राज्यात गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT