Gold-Silver Rate Today: देशभरात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. ८ मे रोजी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, मध्यपूर्वेतील तणाव आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंचे दर गगनाला भिडले आहेत. विशेष म्हणजे दिल्ली, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर दीड लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे.
सध्या भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ५३ हजार ते १ लाख ५३ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४० हजार ते १ लाख ४१ हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ८० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.
दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,८८० रुपये इतका आहे. मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५२,६८० रुपये आहे. पुण्यातही सोन्याचा दर मुंबईइतकाच असून प्रति १० ग्रॅम १,५२,६८० रुपये इतका आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली आहे. भारतात आज चांदीचा दर प्रति ग्रॅम २७५ रुपये तर प्रति किलो २ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७० हजार १०० रुपये आहे. नोएडामध्ये हा दर २ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चेन्नईमध्ये चांदी २ लाख ७४ हजार ९०० रुपयांवर व्यवहार करत आहे.
इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या आणि चांदीकडे वळतात. त्यामुळे या धातूंची मागणी वाढून दरात तेजी येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. परकीय चलन साठा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी गोल्ड रिझर्व्ह वाढवण्यावर भर दिला जात आहे. भारताने २०२३ पासून आतापर्यंत परदेशात ठेवलेले सुमारे १५०.६७ मेट्रिक टन सोने परत आणले आहे. यामुळेही जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांची मागणी वाढली आहे. भारतीय संस्कृतीत लग्नांमध्ये सोन्याला विशेष महत्त्व असल्याने बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. याचा थेट परिणाम दरवाढीवर होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सध्या बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.