PM Modi Appeal WFH: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना इंधन बचत आणि संसाधनांचा संयमाने वापर करण्याचं महत्त्वाचं आवाहन केलं. हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी सांगितलं की, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांचा आणि तणावाचा परिणाम इंधनाच्या किमतींवर झाला असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारतासारख्या देशांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मोदी म्हणाले की, भारताकडे तेलाचे मोठे साठे नाहीत. त्यामुळे इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावं लागतं. यामुळे देशावर आर्थिक ताण येतो. म्हणूनच नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध आहे, तिथल्या नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा सल्लाही मोदींनी दिला. यामुळे इंधनाची बचत होईलच, पण वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
जागतिक संकटाच्या काळात देशाचा परकीय चलन साठा वाचवण्यासाठी मोदींनी एक वेगळंच आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की, पूर्वी युद्धकाळात लोक देशासाठी सोने दान करत होते. आज दानाची गरज नाही, पण देशहितासाठी पुढील एक वर्ष कोणत्याही कार्यक्रमासाठी अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचा संकल्प नागरिकांनी करावा.
भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. त्यामुळे परकीय चलनावर मोठा ताण पडतो. जर काही काळ सोने खरेदी कमी झाली, तर परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.
यावेळी मोदींनी कोविड काळात अंगीकारलेल्या काही कामाच्या पद्धती पुन्हा सुरू करण्याचं आवाहनही केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि व्हर्च्युअल मीटिंग्ज यांसारख्या पद्धतींनी कोरोना काळात कामकाज सुरळीत ठेवलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
मोदी म्हणाले, “कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन मीटिंग्जसारख्या पद्धतींशी जुळवून घेतलं होतं. आज पुन्हा अशी वेळ आली आहे की, राष्ट्रीय हितासाठी या गोष्टींचा अधिक वापर करणं गरजेचं आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, कार्यालयात रोज जाण्याऐवजी शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारल्यास इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्याचबरोबर ऑनलाइन बैठका आणि व्हर्च्युअल कॉन्फरन्समुळे वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचण्यास मदत होईल.
मोदींच्या मते, सध्याच्या जागतिक परिस्थितीत केवळ सरकारच्या प्रयत्नांवर विसंबून चालणार नाही. देशवासियांनीही जबाबदारी स्वीकारत इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणं आणि संसाधनांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे.
जागतिक संकटाच्या या काळात भारत मजबूत राहावा, यासाठी प्रत्येक नागरिकाने छोट्या-छोट्या सवयी बदलण्याची गरज असल्याचा संदेश मोदींनी आपल्या भाषणातून दिला.