Edible Oil Prices Hike Pudhari
अर्थभान

Edible Oil Prices: गॅसच्या तुटवड्यानंतर सर्वसामान्यांना मोठा झटका; आता खाद्यतेलही महागलं, किती रुपये मोजावे लागणार?

Edible Oil Prices: आखातातील युद्धामुळे खाद्यतेलाच्या आयातीवर परिणाम झाला असून बाजारात दर वाढले आहेत. सोयाबीन, पामोलिन आणि सूर्यफूल तेलाच्या किमतींमध्ये प्रतिकिलो सुमारे 10 रुपयांची वाढ झाली आहे.

Rahul Shelke

Edible Oil Prices Hike: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर होऊ लागला आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम खाद्यतेलांच्या किमतींवर झाला आहे. गेल्या आठवड्यात बाजारात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात प्रति किलो सुमारे 10 रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भारतामध्ये तेलबियांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होत असल्याने देशातील खाद्यतेलाची मोठी गरज आयातीवर अवलंबून असते. सोयाबीन तेल, पामोलिन तेल आणि सूर्यफूल तेल यांसारख्या खाद्यतेलांची मोठ्या प्रमाणावर आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांमधून केली जाते. मात्र, सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे समुद्री मार्गावरील वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे आयात होणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या परदेशातून येणाऱ्या तेलाच्या मालाला नेहमीपेक्षा सुमारे आठ दिवसांचा अधिक कालावधी लागत आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल आणि वाढलेला विमा खर्च यामुळे आयात महाग झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारातही खाद्यतेलांच्या किमती वाढताना दिसत आहेत.

या परिस्थितीचा परिणाम किरकोळ बाजारातही जाणवू लागला आहे. घरगुती वापरासाठी घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आयात होणाऱ्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत तयार होणाऱ्या खाद्यतेलांची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेषतः शेंगदाणा तेल (गोडेतेल) आणि राईचे तेल (मोहरीचे तेल) यांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

व्यापारी आणि बाजार विश्लेषकांच्या मते, सध्याची परिस्थिती युद्धावर अवलंबून आहे. जर आखातातील तणाव लवकर कमी झाला आणि समुद्री वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, तर गुढी पाडव्यानंतर खाद्यतेलांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र युद्ध दीर्घकाळ चालू राहिल्यास खाद्यतेलांच्या किमती आणखी वाढू शकतात.

एकूणच, आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीचा परिणाम आता स्वयंपाकघरावर होत आहे. खाद्यतेलांच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्र सध्या जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT