Livspace Layoffs: बंगळुरुमधील होम डेकोर स्टार्टअप कंपनी Livspace मध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. कंपनीने तब्बल 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून, कंपनीचे को-फाउंडर सौरभ जैन यांनीही कंपनीला राम-राम केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, ही कपात Livspace च्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 12 टक्के आहे. कंपनी सध्या मोठ्या संकटातून जात असून खर्च कमी करणं आणि AI-आधारित कामकाज वाढवणं, हा या बदलामागचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे ही घडामोड दिल्लीमध्ये सुरू असलेल्या India AI Impact Summit 2026 च्या पार्श्वभूमीवर घडली आहे.
Livspace ला जागतिक गुंतवणूकदार KKR चा पाठिंबा आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी मनीकंट्रोलला सांगितलं की, पुढील वाढीच्या टप्प्यासाठी अंतर्गत रचना पूर्णपणे बदलली जात आहे आणि Livspace ला “AI-native agentic organisation” बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर सौरभ जैन यांनी कंपनी सोडली आहे. 2015 मध्ये स्टार्टअप DezignUp च्या अधिग्रहणानंतर ते Livspace मध्ये सहभागी झाले होते आणि 2022 मध्ये त्यांची चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या एक्झिटमुळे कंपनीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
Livspace सध्या विक्री, ऑपरेशन्स, डिझाइन आणि मार्केटिंग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांत ऑटोमेशन सुरु करत आहे. अनेक कामं जी आधी मॅन्युअली होत होती, ती आता ‘इंटेलिजंट सिस्टीम्स’द्वारे केली जात आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, AI एजंट्समुळे उत्पादकता वाढत असून कामकाज अधिक वेगाने होत आहे.
गेल्या काही महिन्यांत जागतिक रोजगार मार्केटवर AI चा मोठा प्रभाव दिसून येत आहे. Amazon, Microsoft, TCS आणि Accenture यांसारख्या दिग्गज कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. एकूण आकडा पाहता, गेल्या काही महिन्यांत जगभरात एक लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्याचं सांगितलं जातं आहे.
Livspace कंपनीने 2023 मध्ये जवळपास 100 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं, तर 2020 मध्ये सुमारे 400 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं होतं. नफा वाढवणं आणि खर्च कमी करणं, हा या निर्णयांमागचा उद्देश असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं.
आर्थिक बाबी पाहिल्या तर Livspace चा महसूल आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23 टक्क्यांनी वाढून 1,460 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी तोटा कमी होऊन 242 कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील वर्षी 416 कोटी होता. म्हणजेच आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असली, तरी AI मुळे कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे.
थोडक्यात सांगायचं तर, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात रोजगाराचं स्वरूप कसं बदलत आहे, याचं हे जिवंत उदाहरण आहे. AI मुळे उत्पादकता वाढेल, हे खरं असलं तरी त्याच वेळी हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारात आहे आणि हीच चिंता आज जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.