आंबट सिट्रस फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी वाढू शकते.
केळी काहींना रिकाम्या पोटी जड जाऊ शकतात.
जास्त तंतुमय फळांमुळे फुगलेपणा जाणवू शकतो.
अननसासारखी आम्लीय फळे जळजळ वाढवू शकतात.
पपई, सफरचंद यांसारखे हलके पर्याय सकाळी अधिक योग्य ठरतात.
सकाळी उठल्यावर अनेकजण आरोग्यासाठी फळे खाण्याची सवय लावतात. फळे शरीरासाठी फायदेशीर असली तरी ती कधी आणि कशी खायची यालाही तितकेच महत्त्व आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ, अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
विशेषतः ज्यांना अॅसिडिटी, गॅस किंवा संवेदनशील पोटाचा त्रास आहे, त्यांनी काही फळांबाबत सावध राहणे गरजेचे आहे. सर्वात आधी सिट्रस फळे. संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे छातीत जळजळ किंवा मळमळ होण्याची शक्यता असते.
केळीबाबतही काही तज्ज्ञ सावधगिरी सांगतात. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढू शकते, ज्याचा परिणाम काही लोकांच्या पचनावर होऊ शकतो. विशेषतः ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पेरू किंवा जास्त तंतुमय फळेही काहींना रिकाम्या पोटी जड जाऊ शकतात. त्यामुळे पोटात गोळे येणे किंवा फुगलेपणा जाणवू शकतो. अननसासारखी फळे आम्लीय असतात. ती रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात जळजळ वाढू शकते.
तज्ज्ञांचा सल्ला असा की सकाळी रिकाम्या पोटी फळे खायची असतील तर पपई, सफरचंद किंवा भिजवलेले मनुके यांसारखे हलके पर्याय निवडावेत. तसेच फळांसोबत थोडे सुके मेवे किंवा भिजवलेले बदाम घेतल्यास पचनाला मदत होते.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे एखादे फळ खाल्ल्यानंतर वारंवार त्रास होत असेल तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळली तर फळांचे फायदे अधिक मिळू शकतात.