उन्हाळ्यात फ्रीजमधील अतिथंड पाणी पिण्याऐवजी माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरते. मातीमधील नैसर्गिक गुणधर्मांमुळे पाण्याचा सामू (pH) संतुलित राहतो आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अनेकांना भरपूर थंड पाणी प्यावेसे वाटते. अशा वेळी बहुतेक लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे कधी कधी घशाला त्रास होऊ शकतो किंवा पोटाच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मातीच्या माठातील पाणी त्याच्या चवी आणि थंडपणाव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे आरोग्यदायी फायदेदेखील देते.
शरीराचे तापमान राहते नियंत्रित
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा हा सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. मातीच्या भांड्यातील पाण्यात खनिजांचे प्रमाण वाढते; तर फ्रिजमधील पाण्यात ते कमी होते. उन्हाळ्यात दररोज त्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि ताजेतवाने राहते.
रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत
फ्रिजच्या पाण्यामुळे अनेकदा घसा खवखवणे, उष्माघात किंवा इतर समस्या उदभवू शकतात. माठात पाणी साठवण्याचा फायदा हा आहे की, माती पाण्यातील अशुद्धी शोषून घेते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
घशापासून आतड्यांपर्यंत हे पाणी फायदेशीर
मातीच्या माठातील पाण्याला एक मंद, मातीसारखा सुगंध असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे पाणी घशापासून आतड्यांपर्यंत फायदेशीर आहे. आजारी लोकसुद्धा माठातील पाणी निश्चिंतपणे पिऊ शकतात. मातीमधून शरीराला फायदेशीर ठरणारी नैसर्गिक पोषक तत्त्वे मिळतात.
पचनसंस्था राहते सक्रिय
मातीच्या भांड्यातील पाणी आजारांपासून संरक्षण करते. आयुष मंत्रालय सकाळी कोमट पाणी पिण्याची शिफारसदेखील करते. पण, हे कोमट पाणी मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम मानले जाते. त्यामुळे पचनसंस्था सक्रिय राहते व शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात.