बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : गोबी मंच्युरीयन, बॉम्बे मिठाईनंतर आता रसायनाचा वापर करुन बनवलेली मसाला पाणीपुरी, पाणीपुरीवर बंदी घालण्याची तयारी केली जात आहे. सोमवारी (दि. 24) अन्नसुरक्षा आणि दर्जा खात्याच्या अधिकार्यांनी कृत्रिम रंग वापरुन तयार करण्यात येणार्या सर्व प्रकारच्या कबाबवर बंदीचा आदेश जारी केला होता. आता पाणी पुरी, मसाला पुरीचे नमुने तपासण्यात येत आहेत. Health
अन्नसुरक्षा व दर्जा खात्याने राज्यातील विविध ठिकाणांहून पाणी पुरी आणि मसाला पुरीचे 78 नमुने चाचणीसाठी घेतले होते. यापैकी 18 नमुन्यांमध्ये घातक रसायने असल्याचे दिसून आले. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी तसेच ते आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग व रसायनांचा वापर केला जातो. याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होतात. यामुळे लहान मुलांमध्ये हायपर अॅक्टिव्हनेस होतो.
पाणीपुरी म्हटले की केवळ लहानग्यांनाच नव्हे तर मोठ्यांच्या तोंडालाही पाणी सुटते. याचे नाव काढले की याची चव तोंडात आल्याचा भास होतो. पण, अशा रसायनयुक्त पाणीपुरीमुणे शरीरावर दीर्घकाळ गंभीर परिणामांची शक्यता असून आता त्यावर बंदीची शक्यता निर्माण झाली आहे.Health
पाणी पुरी आणि मसाला पुरीची चव आंबटगोड असते. ही चव येण्यासाठी हानिकारक रसायने वापरली जात असल्याचे चाचणीवेळी दिसून आले. पुरीचे नमुनेही घेण्यात आले असून त्याची मायक्रोबॅक्टेरिया चाचणी केली जात आहे. त्यामध्ये कोणतेही बॅक्टेरिया आढळले नाहीत. आतापर्यंतच्या केवळ काहीच चाचण्यांचा अहवाल मिळाला आहे. सर्व नमुन्यांच्या चाचण्यांचा अहवाल मिळाल्यानंतर रसायनयुक्त पाणीपुरी आणि मसालापुरीवर बंदीचा आदेश जारी केला जाणार आहे.
राज्यातील अनेक ठिकाणांहून पाणीपुरी व मसालापुरीचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. याबाबतचा अहवाल तातडीने मागवण्यात आला आहे. आगामी तीन दिवसांत अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. पुढील सोमवारपर्यंत बंदीचा आदेश जारी होऊ शकतो, असे अन्नसुरक्षा व दर्जा खात्यातील अधिकार्यांनी सांगितले. Health
राज्यभरातील पाणी पुरी आणि मसाला पुरीचे नमुने संग्रहित केले आहेत. हे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. काही नमुन्यांमध्ये रसायनांचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून ते पदार्थ खाण्यासाठी असुरक्षित ठरले आहेत. आणखी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- श्रीनिवास के. (आयुक्त, अन्नसुरक्षा आणि दर्जा खाते)