पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याचे प्रमाण वाढल्याच्या घटना दिसून येत आहे. या घटना पाहता सरकारकडून गाड्यांच्या टेस्टिंगशी संबंधीत काही नियम बनवण्यात येत आहेत. यामध्ये गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरी, बॅटरी मॅनेजमेंट आणि सेल या सर्व बाबींचा विचार करता नवे नियम आणत बदल करण्यात येत आहे. (EV Vehicle)
ज्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या कंपन्यांच्या स्कूटर्संना आग लागली होती त्या कंपन्यांसोबत सरकार चर्चा करत आहे. गाड्यांना भविष्यात आग लागण्याच्या घटना थांबविण्यासाठी ओकिनावा, ओला, जितेंद्र आणि प्युअर इव्ही या कंपन्यांना ठोस पाऊल उचलण्याचे सुचविण्यात आले आहे. यासंबंधी सरकार लवकरच इव्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत.
तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत देशातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या किमान 6 घटनांची नोंद झाली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले होते की, मूळ उपकरण उत्पादकांनी (OEMs) अलीकडील अपघात झालेल्या मॅाडेल्स परत घ्याव्या असे सुचवण्यात आले आहे. त्यानंतर ओकिनावाने 16 एप्रिल रोजी आपल्या 3,000 हून अधिक स्कूटर परत मागवण्याचा निर्णय घेतला.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 31 मार्च रोजी लोकसभेत ईव्ही आगीच्या प्रकरणांवर बोलताना उच्च तापमानामुळे ही घटना घडली असावी, असे म्हटले होते. दरम्यान, या आगींमागचे कारण आम्ही शोधत आहोत, असेही त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी फॉरेन्सिक तपासणीचे आदेश दिले आहेत. आग लागल्याचे कारण शोधून सरकार पुढील कारवाई करेल, असे ते म्हणाले.
हेही वाचा