मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यभरात अवकाळी पावसानंतर शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. शेतपिकांच्या नुकसानीनंतर उपाययोजना आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत यावेळी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. (Unseasonal rain damages crops)
गेल्या ४८ तासांत मराठवाड्यासह विदर्भातील काही भागांत पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील नित्रूड गावात रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. नित्रुडसह परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीटही झाली. गारपीट व अवकाळी पावसामुळे आंब्यासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असून ज्वारी, गहू, हरभरा ही पिकांना फटका बसला आहे. उभी पिके ही भिजल्याने ज्वारी व गहू पिकाचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
पावसासह गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पिकांसह आंबा आणि इतर फळबागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाने काढून ठेवलेला गहू, ज्वारी, हरभरा ही पिके भिजल्याने नुकसान झाले आहे. तर उभी पिके भिजल्याने ज्वारी व गहू पिकांचे दाणे काळे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, उमराणे परिसरातील चिंचवे येथे काल (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा :