पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनने आपल्या देशाच्या नवीन नकाशाची आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चीनने भारताचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्र आपल्या हद्दीत असल्याचे दाखवत भारताच्या प्रदेशावर पुन्हा दावा केला आहे. चीनने नकाशा जाहीर करताच वाद निर्माण झाला. यानंतर भारताने अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील असे प्रत्युत्तर दिले आहे.
चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने 'X' वर ट्विट केले आहे की, चीनने सोमवारी (दि.२८) आपल्या देशाचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये चीनने चीनसह आणि जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय सीमा रेखाटल्या आहेत. ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या चीनच्या या नकाशात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन हा प्रदेश चीनचाच प्रदेश असल्याचे चीनने म्हटले आहे.
चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे तर तैवानलाही आपल्या भूभागाचा भाग मानतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानला एकत्र आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी चीन व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि दक्षिण चीन समुद्रावरही दावा करतो. दरम्यान, भारताने चीनचा हा नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेला नकाशा नाकारला आहे. यावर अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तो भारताचाच अविभाज्य भाग राहील, असे भारताने चीनला ठणकावून सांगितले आहे.