छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मंत्री छगन भुजबळ घटनेच्या पदावर बसून राज्यात जातीय तेढ निर्माण करत आहे. ते दंगली भडकवण्याची भाषा करत आहे. अनेक वर्षांपासून मराठ्याच्या विरोधात बोलत आहे. ते बोलल्याने महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. सरकार मात्र, त्यांना समज देण्याऐवजी बळ देत आहे. त्यांचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय करत असाल, तर जड जाईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शांततेच्या मार्गाने आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल. असेही त्यांनी नमूद केले. Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणासाठीच्या चौथ्या टप्यातील दौऱ्यानंतर प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात मंगळवारी (दि.१२) रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.१३) रुग्णालयातच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. Manoj Jarange Patil
राज्यात अशांतता निर्माण कुणी केली, हे सर्वांना माहित आहे, असा अप्रत्यक्ष आरोप तुमच्यावर भुजबळांकडून करण्यात आला, यावर जरागें म्हणाले, भुजबळ कुणावरही आरोप करतो, बधीर झालं आहे. त्याच्या एवढा तेढ करणारा नेता कुणी नाही. बीडमध्ये त्याच्याच पाहुण्यांनी घर जाळलं अन् विनाकारण मराठ्यांना बदनाम करत आहे. ज्यांचं घर जळाले ते साळुंखे, क्षीरसागर म्हणाले, जाळपोळीत मराठा नाही. तरी हा वारंवार निष्पाप मराठ्याचं नाव घेतोय. जाळपोळीत कोड नंबर असल्याचं पोलिसांना माहीत नाही. मग भुजबळला कसं माहिती? याचं ऐकून तुम्ही निष्पाप लोकांवर केसेस केल्या, अंतरवालीत अटक केली. मग बीडमध्ये याच्याच पाहुण्यांनी घर जाळलं. ते लोक अटक का नाही, असा सवालही जरांगेंनी उपस्थित केला.
ज्यांनी केलं त्याचं समर्थन नाही. मात्र निष्पाप लोकांना अटक करू नका. फडणवीस यांच्या बाबतीत समाजात चांगली भावना आहे. मात्र भुजबळ बोलायला लागल्यावर ते मराठ्यांवर अन्याय करत आहे. अशी शंका निर्माण होत असून, हा गैरसमज दूर करावा, याचं ऐकाल तर तुमचा पुढचा प्रवास जड जाईल. हा इशारा नाही मात्र आम्ही जे बोलतो ते करतो. हे सरकारला माहिती आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळाचे ऐकून अन्याय करु नये, अशी विनंती जरांगेंनी केली. आमच्या नोंदी शासकीय अधिकृत सापडल्या आहे. बाकी ओबीसी नेत्यांना आम्ही नाव ठेवणार नाही. कारण त्यांचे आमचे गाव पातळी संबंध चांगले आहे. हा एकच आहे जो बोलत आहे. यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे.ते धनगर आरक्षण बाबत भुमिका स्पष्ट करत नाही. मराठ्यांमुळे धनगर, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही.
उपोषण सोडवण्याच्या वेळी तीनही गटाचे नेते आले होते, त्या सगळ्यांच्या साक्षीने अंतरवालीतील गुन्हे २ दिवसांत तर, राज्यातील सगळे गुन्हे महिन्याभरात मागे घेऊ, एकाही माणसाला अटक केली जाणार नाही. असे ठरलं होते. २४ डिसेंबर ही तारीख सरकारने दिली. तोपर्यंतचा वेळ सरकारने आमच्याकडून घेतला. त्याचे फोटो, व्हिडिओ आहेत. ते पुरावे आम्ही २४ तारखेला समाजाला देऊ, मात्र तोपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्यावर विश्वास असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
१५ डिसेंबरला ठराव मांडला तर १६ ला कायदा पारित करावा. सर्व समाज अधिवेशनाकडे लक्ष देऊन आहेच. पुढची दिशा ठरविण्यासाठी १७ तारखेला अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक बोलावली आहे. यात सर्व स्वयंसेवक, उपोषण, साखळी उपोषण करणारे, डॉक्टर्स, साहित्यिक, अभ्यासक उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा