पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते. त्यातच 2024 नंतर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे, असे ठरले होते. असे झाले तर मग आपण पुन्हा कसे निवडून येणार, या भीतीमुळे आमदार उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर झाले आणि शिवसेना फुटली, असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
टिफिन बैठकीसाठी बावनकुळे शनिवारी पुणे दौर्यावर आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते, त्यांच्या खिशाला पेनसुद्धा नसायचा. परिणामी, शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती. मात्र, अजित पवार सकाळी सहापासून रात्री एकपर्यंत मंत्रालयात त्यांच्या आमदारांची कामे करायचे. राष्ट्रवादीने शंभर आमदार निवडून येण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, तर शिवसेनेच्या आमदारांची कामेच होत नव्हती. पाच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री राहणार आणि 2024 नंतर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे, असे शिवसेना-राष्ट्रवादीचे ठरले होते. याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागल्याने त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले.
भाजप आणि शिवसेना एक परिवार आहे. परिवारातील दोन भावांमध्ये मतभेद होत असतात. तसे काही मतभेद झाले तर पक्षनेतृत्व, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ते मतभेद दूर करण्यास सक्षम आहेत. एखाद्या जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना युती तुटणार नाही. ही युती फेविकॉलने जोडलेली आहे.
एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत. खा. श्रीकांत शिंदे चांगले काम करत आहेत. एखादी घटना युतीमध्ये दरी निर्माण करू शकत नाही. 2024 मध्ये पुन्हा राज्यात भाजप – शिवसेनेचे सरकार येईल, शिवसेनेचे आमदार निवडून येण्यासाठी भाजप आपल्या उमेदवारांपेक्षा दहा टक्के अधिकच काम करेल. पहिल्या जाहिरातीला दुसर्या जाहिरातीने नष्ट केले आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा: