Khanapur Taluka Youth Death
खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी गावात गटारीतून पाणी सोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१४) सकाळी घडली. या घटनेत अमीरहुसेन पाश्चापूर (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून नंदगड पोलिसांनी संशयित आरोपी अशोक रामा उगरखोड (वय २८) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमीरहुसेन पाश्चापूर आणि अशोक उगरखोड यांच्यात घराच्या मागील बाजूस असलेल्या गटारातून पाणी वाहून नेण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत होत्या.
मंगळवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात अशोक उगरखोड याने जवळच पडलेल्या पिकासाने अमीरहुसेन यांच्या डोक्यावर आणि छातीवर वार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
गंभीर जखमी झालेल्या अमीरहुसेन यांना प्रथम इटगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच आरोपी अशोक उगरखोड याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर तोलगी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, क्षुल्लक कारणातून सुरू झालेला वाद एका व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.