निपाणी: पुढारी वृत्तसेवा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट येथे धोकादायक वळणावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला कार चालकाचा ताबा सुटल्याने मागुन धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील मुलगा सिद्धार्थ बाळकृष्ण तावदारे (वय १२) रा.रामनगर,निपाणी हा जागीच ठार झाला.तर त्याचे वडील महेश उर्फ बाळकृष्ण मलाप्पा तावदारे (वय ४२) त्यांचे मित्र नारायण मारुती यादव (वय ४८) मुळगाव कुर्ली,सध्या रा.दौलतनगर निपाणी व चालक सौरभ सातापा बागे (वय २३) रा.श्रीपेवाडी हे तिघे जखमी झाले.हा अपघात रविवारी दुपारी झाला.घटनेची नोंद शहर पोलीसात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, चालक सौरभ बागे हा येथील स्टील मटेरियल विक्री व्यावसायिक महेश तावदारे यांच्या कारमधून महेश यांच्यासह त्यांचा मुलगा मयत सिद्धार्थ तावदारे जखमी नारायण यादव यांच्यासमवेत आजरा येथे काही कामासाठी जात होते.त्यांची कार तवंदी घाटातील धोकादायक दुसऱ्या वळणावर आली असता चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेकचा प्रयत्न केला असता रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कंटेनरला कारची मागुन जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, कार निम्म्या भागापर्यंत कंटेनरमध्ये घुसल्याने चालकाच्या शेजारी पुढे बसलेला सिद्धार्थ हा जागीच ठार. झाला तर त्याच्या मागील सिटवर बसलेले नारायण यादव तसेच चालक सौरभ बागे व महेश तावदारे हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळतात रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसासह मयत व जखमीच्या नातेवाईकांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ हवालदार मंजुनाथ कल्याणी, निपाणी टाऊन प्लॅंनिंगचे अध्यक्ष निकु पाटील, वसंत धारव, रमेश भोईटे, सागर पाटील, सुभाष शिंदे,अनिल श्रीखंडे,अक्षय जयकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तिघांवर सरकारी महात्मा गांधी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.या अपघाताची भीषणता इतकी होती,की कारचा निम्मा भाग कंटेनरच्या मागील बाजूस घुसल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले.याबाबत कंटेनर चालकाविरोधात महेश तावदारे यांनी रितसर फिर्याद दिली आहे.
अपघातातील मयत सिद्धार्थ तावदारे हा केएलई संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिसरी इयतेमध्ये शिकत होता.त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील,आजी आजोबा, भाऊ असा परिवार आहे.
थांबलेला कंटेनर नसता तर. ..
रस्त्याच्या बाजूला ब्रेक डाऊन अवस्थेत उभा असलेल्या कंटेनला कारची मागून धडक बसल्याने हा अपघात झाला. जर का कंटेनर रस्त्याच्या बाजुला नादुरुस्त अवस्थेत थांबला नसता तर कदाचित हा अपघात टळला असता अशी चर्चा घटनास्थळी लागुन होती