निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी येथील नरवीर तानाजी चौक येथे मोकाट बैल व गायीची झुंज लागल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडला. यात नगरपालिकेचे कर्मचारी अमर कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर या झुंजीमुळे चार कार, पाच दुचाकींसह दुकानांची मोडतोड झाल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सुमारे तासभर ही झुंज सुरूच होती. त्यामुळे व्यावसायिक व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. गेल्या अनेक दिवसापासून निपाणी शहरातील बाजारपेठ व इतरत्र मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागातील नरवीर तानाजी चौक परिसरात रस्त्यावर विखरुन पडलेल्या खाद्यपदार्थासह इतर वस्तू खाण्याच्या नादात दोन मोकाट जनावर एकत्र आले.
यावेळी त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झुंज लागली. दरम्यान यावेळी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी लागलेले झुंज सोडण्यासाठी दगड काट्यांचा वापर केला. दरम्यान यातील बैलाने काही नागरिकांचा पाठलाग केला. यात नरवीर तानाजी चौक येथे शुद्ध पाण्याच्या घटक केंद्रात काम करणारे पालिका कर्मचारी अमर कांबळे यांनीही लागलेली झुंज सोडवण्यासाठी प्रयत्न चालवला.दरम्यान त्याच्या अंगावर बैल आल्याने व जवळ असलेला लाकडी बांबू त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांना परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात हलवले.
दरम्यान यावेळी लागलेल्या झुंजीत नरवीर तानाजी चौक परिसरातील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चार कार,पाच दुचाकींसह मुख्य रस्त्यावरील दुकानाच्या समोरील बोर्ड,फलक तसेच फर्निचर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुमारे एक तासभर ही झुंज सुरू होती. यावेळी लागलेली झुंज व बैलांची अवस्था पाहून अनेक नागरिकांनी त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला असता, मात्र दोन्हीही जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने लागलेली झुंज सोडवण्यासाठी अडथळा ठरला.
दरम्यान यावेळी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकासह परिसरातील व्यवसाय व नागरिकात घबराट पसरली होती.दै.पुढारीने यापूर्वी वारंवार निपाणी नगरपालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे वृत्त प्रसिद्ध केले होते मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिक व्यावसायिक तसेच उद्योजकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.विशेष म्हणजे निपाणीचा आठवडी बाजार तसेच दररोजच शहराच्या बाजारपेठेसह इतर भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वारंवार वाहनासह इतर बाबींचे मोकाट जनावरांकडून नुकसान होत आहे. असे असले तरी मंगळवारी रात्री लागलेल्या झुंजीमुळे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न व्यावसायिक व नागरिकांतून विचारला जात आहे. यावर नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त वेळीच करावा अशी मागणी होत आहे.
अलीकडच्या काळामध्ये निपाणीतील प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.बऱ्याच वेळेला बस स्थानक सर्कल,डाक बंगला चौक,बेळगाव नाका, कोठीवाले कॉर्नर,नेहरू चौक, कित्तूर राणी चन्नमा सर्कल,अशोक नगर या ठिकाणी शहरात फिरणारी मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण म्हणून बसतात.त्यामुळे वाहतुकीसह नागरिकांना अडचणी ठरते. हे सहजासहजी पालिका प्रशासनाला दिसत असतानाही प्रशासनाने याबाबतीत कोणत्याच उपायोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा