Khanapur Car Accidnet
हॉटेलमध्ये जेवण करून परतताना भीषण अपघात, २ मित्रांचा जागीच मृत्यू  file photo
बेळगाव

हॉटेलमध्ये जेवण करून परतताना भीषण अपघात, २ मित्रांचा जागीच मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतताना कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. खानापूर-जांबोटी मार्गावरील रेल्वे पुलापासून काही अंतरावर असलेल्या कुंभार नाल्यावरील पुलावर बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.

शंकर उर्फ मिथुन मोहन गोमानाचे (वय २५, रा. मच्छे, ता. जि. बेळगाव) व आशिष मोहन पाटील (वय २६) मूळ हत्तरवाड, ता. खानापूर सध्या रा. मच्छे) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. निकेश जयवंत पवार (वय २५, रा. मच्छे) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाच्या बाजूला बसलेला जोतिबा गोविंद गावकर (वय २७, रा. मच्छे) हा किरकोळ जखमी झाला आहे.

हॉटेलमध्ये जेवण करून घरी परतताना अपघात

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छे येथून चार मित्र कारने खानापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण करून ते जांबोटी मार्गे परत जाण्यासाठी निघाले. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या कठड्याला कार धडकली. धडक एवढी जोरदार होती की कारचा समोरचा टायर व काही भाग त्याच ठिकाणी तुटून पडला आणि तरुणांसह कार तीस फूट लांब अंतरावर पलट्या घेत जाऊन कोसळली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गाडीतच अडकून पडले होते. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने दवाखान्यात हलविले. ही धडक इतकी भीषण होती की कार चक्काचूर झाली असून अपघातस्थळी तुकड्यांच्या स्वरूपात कारचे सुटे भाग विखुरले होते. खानापूर सरकारी दवाखान्यात शवचिकित्सेसाठी मृतदेह नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मच्छे येथील तरुणांनी सरकारी दवाखान्याच्या परिसरात गर्दी केली होती.

SCROLL FOR NEXT