चिकोडी/ जमखंडी : उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात मुधोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागलेे. संतप्त शेतकर्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली. यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक जिल्हा पोलिस प्रमुखांसह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी, मुधोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकर्यांमध्ये होता. याविरोधात आंदोलन करण्याचे हेतूने शेतकरी रिकामे ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला घेराव घालण्यासाठी जात होते. सकाळपासून शांत पद्धतीने आंदोलन सुरू होते. पण, सायंकाळी आंदोलन चिघळले आणि रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. त्यानंतर कारखान्याच्या आवारात असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना शेतकर्यांनी आग लावली. बघता, बघता या आगीमध्ये सुमारे 30 हून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली जळून खाक झाल्या आहेत. याठिकाणी असलेल्या अनेक दुचाकीदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडफेक करण्यात आली.
यावेळी झालेल्या दगडफेकीत बागलकोट अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महांतेश्वर जिद्दी यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महांतेश्वर जिद्दी गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक पाय तुटला असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.सदर आंदोलनात शेतकर्यांनी आग लावलेली नसून हे समाजकंटकांचे काम आहे. शेतकरी कधीही दुसर्या शेतकर्याच्या उसाला आग लागत नाही. शेतकर्यांकडून हे कृत्या झाल्याचा मला विश्वास नाही. समाजकंटकांकडून हे कृत्य झाले असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील सांगितले.