मणतुर्गा : पाण्याखाली गेलेला हालात्री नाल्याचा पूल. (Pudhari File Photo)
बेळगाव

Belgaum Heavy Rain | पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला

हालात्रीचा पूल दिवसभर पाण्याखाली; जळगा रस्त्यावर आले पाणी

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : पश्चिम भागाला सोमवारी (दि. 14) रात्रभर संततधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मणतुर्गा गावाजवळील हालात्री नाल्याचा पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी (दि. 15) दिवसभर खानापूर- हेमाडगा मार्गावरील रहदारी ठप्प झाली होती. जळगे-करंबळ मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग देखील काही काळ बंद झाला होता.

सोमवारी दिवसभर पावसाने दडी मारली होती. तथापि रात्रीपासून जोरदार सरींना सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरुच होती. तथापि रात्रभर झालेल्या पावसामुळे नाले-ओढे पात्राबाहेर गेल्याने शेती पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी दिवसभर खानापूर शहरात पावसाची रिपरीप सुरु असली तरी पश्चिम भागात संततधार कायम होती. जळगे व करंबळ परिसरातील शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे. जळगे मार्गावरील शेतवडीचे पाणी पुलावर आल्याने जळगे-करंबळ मार्ग रहदारीसाठी काही काळ ठप्प झाला होता.

नेरसा, निलावडे, अशोकनगर, मणतुर्गा भागात पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने हालात्री नाल्याला पूर आला आहे. परिणामी खानापूर-हेमाडगा मार्गावरील रहदारी दिवसभर बंद झाली होती. सायंकाळीही या पुलावर तीन फूट पाणी होते. त्यामुळे, वाहनधारकांची गैरसोय झाली.

शेतीकामांना जोर

गेल्या चार दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने रोप लावणी करणारे शेतकरी चिंतातूर झाले होते. चिखलणी व रोप लावणीच्या कामासाठी मोठ्या पावसाची गरज होती. रात्रभर झालेल्या संततधारेने शिवारे जलमय झाली असून आगामी आठवडाभर रोप लावणीची धांदल उडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT