बेळगाव

‘आम्हाला वेळ नाही, तुम्हीच उरका’ : जन्मदात्रीच्या मृत्यूकडे दोन्ही मुलांची पाठ; सामाजिक कार्यकर्त्यांनी उरकले सोपस्कार

Mother's funeral neglected by sons | समाजात वाढत असलेली भावनाशून्यता व निष्ठुरतेचा कळस

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : वृद्ध आईची जबाबदारी नको म्हणून तिला आधीच वृद्धाश्रमात ढकलणाऱ्या तिच्या दोघा मुलांनी मृत्यूनंतर तिच्या अंत्यसंस्काराला येणेही टाळले. या वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलांना फोन केला. यावेळी त्यांनी आम्हाला वेळ नाही तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या, अशी भावनाशून्य प्रतिक्रिया देऊन चक्क फोन कट केला. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या वृद्धीवर अंत्यसंस्कार केले.

शाहूनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या अंजना या मूळच्या बेळगाव तालुक्यातील मारीहाळ येथील आहेत. दोन्ही मुलांकडून व्यवस्थित सांभाळ होत नाही म्हटल्यानंतर त्यांना शाहूनगर येथील एका वृद्धाश्रमात ठेवले होते. वृद्धापकाळाने त्यांचा नुकताच मृत्यू झाला. वृद्धाश्रम व्यवस्थापकाने त्यांची दोन मुले असल्याने त्यांना फोन करून आईच्या निधनाची वार्ता दिली. परंतु, दोन्ही मुलांनी आम्हाला वेळ नाही, आम्ही येऊ शकत नाही, तुमचे तुम्ही अंत्यसंस्कार आवरा, असे सांगून चक्क फोन कट केला.

आता काय करायचे हे न सुचल्याने व्यवस्थापकाने नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील, समाजसेवक गंगाधर पाटील यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी पुढाकार घेऊन या वृद्धेवर अंत्यसंस्कार केले. काही महिन्यांपूर्वी बेळगावातच परदेशात राहणाऱ्या मुलांनी आपल्या वृद्ध बापाच्या अंत्यसंस्काराला येणे टाळले होते. या घटनेत मुले येथेच राहत असताना देखील आईच्या अंतिम दर्शनाला फिरकले नाहीत. हा प्रकार म्हणजे समाजात वाढत असलेली भावनाशून्यता व निष्ठुरतेचा कळस असल्याची संतापजनक प्रतिक्रिया बेळगावकरांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT