चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त असलेले बाळू धानोरकर (Balu Dhanorkar Last Rites on wednesday) यांचे आज (दि. ३०) पहाटे दिल्ली येथे निधन झाले. दुपारनंतर त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या बुधवारी (दि. ३१) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचा आज पहाटे नवी दिल्ली येथे रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. दोन-तीन दिवसांपूर्वीच मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी चंद्रपूर वर्णी आर्णी मतदार संघात विजय मिळवला होता.
खासदार बाळू धानोरकर याचे पार्थिव नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयातून एअर अॅम्बुलंसच्या माध्यमातून नागपूरला आणण्यात आले. नागपुरमधून पुढे रस्ता मार्गाने पार्थिव थेट वरोरा येथे आणण्यात आले. वरोरा येथील निवासस्थानी नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ३१ मे रोजी वणी-वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वरोरा येथील निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनासाठी वरोरा शहरासह जिल्ह्यातील कार्यकत्यानी गर्दी केली आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यातील मोठे नेते दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
खासदार धानोकर यांनी, लठ्ठपणा कमी करण्याकरीता चरबीची काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्यांना पोटाचा आजार सुरू झाला होता. किडनीस्टोन आजाराचा त्यांना त्रास होत होता. महिनाभराच्या कार्यकाळात त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास फारच धकाधकीचा ठरला. बाजार समित्यांच्या निवडणूकीमध्ये त्यांनी चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, मूल या ठिकाणी आपली सत्ता आणण्याकरीता मेहनत घेतली. परंतु एकाही ठिकाणी त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणामुळे ते त्रस्त होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांना नागपूरात उपचारार्थ भरती करण्यात आले. त्याच वेळी बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही नागपूरात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. किडनीस्टोनची शस्त्रक्रियाही त्यांचेवर नागपूरात पार पडली होती. त्यांनतर प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना दिल्लीत हलविण्यात आले. मात्र आजाराचा त्रास वेदनादायी ठरल्याने त्यांनी आज पहाटेला अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा