नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण या दोन बंदरांना २०२२-२३ मधील उत्कृष्ठ कार्यासाठी 'सागर श्रेष्ठ सन्मान' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. इंडिया इंटरनॅशनल केंद्रामध्ये आयोजित या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते 'हरित सागर' ग्रीन पोर्ट मार्गदर्शक तत्वाचे लोकार्पण देखील केले. कार्यक्रमातून 'सागर श्रेष्ठ सन्मान' पुरस्काराने देशातील १२ बंदरांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख बंदरांमध्ये निष्पक्ष आणि निरोगी स्पर्धा निर्माण करणे आणि येत्या वर्षात त्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश या पुरस्कारामागचा आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने वर्ष २०२२-२३ च्या एकूण कार्यप्रदर्शनात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जवाहरलाल नेहरू पोर्टला वर्ष २०२२-२३ च्या बंदराला टर्न-अराउंड-टाइम (नॉन-कंटेनर पोर्ट) मध्ये परफॉर्मन्स पुरस्कार मिळाला. २०२२-२३ च्या एकूण वार्षिक कामगिरीनूसार सहावा क्रमांक प्राप्त झाला. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी आणि उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यावतीने नितीन बोरवनकर, मुख्य व्यवस्थापक एमईसीएचएल इलेक्ट्रीकल इंजीनियर अँड सीईओ एसईझेड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हेही वाचा :