पुढारी ऑनलाइन डेस्क : अंधेरी पूर्व विधानसभा पाेटनिवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अर्ज माघारी घेतील, अशी घाेषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये केली. यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ( Andheri Bypoll )
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. सुरुवातीला ऋतुजा लटके विरुद्ध मुंबई महापालिका, असे राजीनामा नाट्य रंगले. ते संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके विरुद्ध भाजप आणि शिंदे गटाचा उमेदवार मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत रंगणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ऋतुजा या दिवंगत आमदार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना बाळासाहेबांची शिंदे गटाने निवडणूक लढवू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्यामुळे या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट निर्माण झाला. त्यापाठोपाठ शरद पवार यांनीही राजकीय पक्षांनी निवडणूक टाळण्याचे आवाहन केले. सोबतच ऋतुजा यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर भाजप आणि शिवसेना बाळासाहेबांची शिंदे गटाकडून उमेदवार मुरजी पटेल यांनी 'वेट अँड वॉचचा' सल्ला दिला गेला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मला पक्षातील सहकार्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागेल. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या निधनानंतरची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही सकारात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असल्याना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, सोमवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी सकाळपासून बैठका आणि खलबते सुरू होती. प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर भाजप आणि शिंदे गटाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुरजी पटेल यांनी आज सोमवारी अखेर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
हेही वाचा: