पुढारी ऑनलाईन : गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हाहाकार उडाला आहे. रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून किमान २० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नैसर्गित आपत्तीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
संबंधित बातम्या :
गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या आपत्तीत ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य केले जात आहे. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे," असे अमित शहा यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या (SEOC) अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दाहोद जिल्ह्यात ४, भरुच ३, तापी २ आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारीही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. SEOC ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुजरातमधील २५२ तालुक्यापैकी २३४ तालुक्यात रविवारी पाऊस पडला. सूरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांत १६ तासांत ५०-११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आणि शेतपिकांचेही नुकसान झाले आहे.
राजकोटमध्ये गारपीट झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.