

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही गुजरातच्या लोकांनी दिलेला जनादेश नम्रपणे स्वीकारतो. आम्ही पुन्हा एकदा गुजरातमध्ये पक्षाची पुनर्रचना करत प्रयत्न करु. जनतेच्या हक्कासाठी आमची लढाई सुरूच ठेवणार, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
यासह त्यांनी हिमाचलच्या विजयावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, हिमाचल प्रदेशच्या लोकांना या निर्णायक विजयाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना विजयाबद्दल शुभेच्छा. तुमच्या परिश्रमामुळे आणि समर्पणामुळेच हिमाचल प्रदेशमध्ये हा विजय मिळवता आला, असे राहुल गांधी म्हणाले. जनतेला दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने १२० जागांवर विजय मिळवला आहे. तर ३६ जागांवर निर्णायक आघाडी मिळवली आहे. गुजरातमध्ये बहुमतासाठी ९५ जागांची आवश्यकता होती. भाजप बहुमतापेक्षा अधिक ६१ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे.