

जळगाव पुढारी वृत्तसेवा – प्रेम प्रकरणातून चोपडा शहरातील प्रेमी युगलाची हत्या करणाऱ्या भावासह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये मुलीच्या भावांसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा तर वकीलाने पुरावे नष्ट करण्यास मदत केली म्हणून पाच वर्ष करावासाचे शिक्षा सुनावली आहे.
जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मयत वर्षा समाधान कोळी व राकेश संजय राजपूत या दोघांचं प्रेम प्रकरण होते. यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती वर्षा कोळी यांच्या घरच्यांना मिळाल्यावर मुलगा दुसऱ्या समाजाचा आहे त्यामुळे संबंध तोडून टाकावे यावरून नेहमी वाद होत होते. १२ ऑगस्ट २०२२ रोजी मयत राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्याने व तो वर्षा कोळी हिच्याशी प्रेमसंबंध बाबत बोलू लागल्याने त्याचा संशयित आरोपींना राग आला.. त्यावरून वाद झाला. संशयीतांनी वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेऊन तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला तर वर्षा कोळी हीचा त्या जागी गळा दाबून हत्या करण्यात आली. चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असताना व पोलिसांचा तपास सुरू असताना संशयित आरोपींनी पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात आले. संशयित आरोपींनी गुन्हा केल्यानंतर वकील नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुणाबाबत सल्ला घेतला. खून करणे, खुनाची तयारी करणे तसेच पुरावा नष्ट करणे असे विविध प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. तसेच एकमेकांसोबत झालेल्या संभाषणाच्या सीडीआर रिपोर्ट व एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच पिस्टल मधील गोळी या सर्व पुराव्यानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला.
तपास अधिकारी डीवायएसपी ऋषिकेश रावले, नाशिकचे वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मयत राकेश राजपूत, आई मिनाबाई संजय राजपूत यांची साक्ष तसेच इतर पुराव्यानुसार अमळनेर न्यायालयाने संशयित आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.
जिल्हा न्यायाधीश २ पी. आर. चौधरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले. सरकारी वकील एड. किशोर बागुल यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्यात तुषार आनंदा कोळी (वय वर्ष २३), भरत संजय रायसिंग (वय वर्ष २२), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय १९), आनंदा आत्माराम कोळी (वय ५६) रवींद्र आनंदा कोळी (वय वर्ष २०) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच संशयित आरोपी पवन नवल माळी आणि वकील नितीन मंगल पाटील यांना पाच वर्षे शिक्षा आणि एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे..