पायी चालत करावे लागणार आंबोलीचे पर्यटन! | पुढारी

पायी चालत करावे लागणार आंबोलीचे पर्यटन!

सावंतवाडी : पुढारी वत्तसेवा
आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना चालतच पर्यटनस्थळी जावे लागणार आहे. तसा निर्णय शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. वर्षा पर्यटन पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटनस्थळी 120 पोलिसांची फौज तैनात केली जाणार असून तिंनही गावांच्या वतीने पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रू. शुल्क आकारण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्यात ही बैठक झाली.

पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंखे, तहसीलदार श्रीधर पाटील, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, उपनिरीक्षक अमित गोते, बांधकाम विभाग शाखा अभियंता विजय चव्हाण, वनक्षेत्रपाल विद्या घोडके, तलाठी शैलेश घाडीगावकर, सर्कल जी. आर. गुरव, बांधकाम विभाग सुपर वायझर शैलेश राणे, ग्रामविकास अधिकारी रतिलाल बहिरम, सरपंच दत्तू नार्वेकर, प्रमोद सावंत, पारपोली सरपंच,चौकुळं सरपंच सुरेश शेट्ये, गेळे सरपंच अंकुश कदम,सदस्य काशीराम राऊत,महेश पावसकर,स्वप्नीता कर्पे,हवालदार दत्ता देसाई,पोलीस एच एल चौधरी, पर्यटन व्यावसायिक रूपा गावडे,विलास गावडे,आनंद गावडे,अनंत पडते,हेमंत ओगले, अमरेश गावडे,सचिन नार्वेकर,वामन पालेकर,प्रकाश गावडे,एकनाथ पारधी,पांडुरंग गावडे, सिद्धेश भिसे, निर्णय राऊत आदी उपस्थित होते.

वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत दाखल होणार्‍या पर्यटकांना आता पार्किंग जागेतच गाड्या लावून पर्यटन स्थळावर चालतच जावे लागणार आहे. त्यासाठी रिक्षा किंवा अन्य गाड्यांचा पर्याय खुला आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.आंबोली चौकुळ आणि पारपोली या तीनही गावांची संयुक्त 10 रुपये करवसुली करण्यात येणार आहे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी 120 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात येणार असून स्थानिक तरुणांची मदत घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. आंबोलीत शनिवार, रविवार 120 पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.आंबोली-चौकुळ रस्ता, महादेवगड रस्ता तसेच पार्किंग असणार्‍या ठिकाणी सर्व गाड्या पार्किंग करून धबधब्याकडे पाठवण्यात येणार आहे.आंबोलीतील रिक्षा तसेच परमिट असणार्‍या खाजगी गाड्यांसाठी दर ठरवून दिले जाणार आहेत. वाहतूक पोलीसांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. वीज कर्मचारी जादा देण्यासाठी सूचना करण्यात येणार आहेत. धिंगाणा घालणार्‍या पर्यटकांवर कारवाई होईल.एक नंबर देण्यात येणार असून धिंगाणा किंवा अनुचित प्रकाराबाबत फोन केल्यास तत्काळ पोलीस येणार आहेत. काही ठिकाणी सुरक्षासाठी रेलिंगची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Back to top button