

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी शक्ती अधिक शिरजोर होऊ लागल्या आहेत. त्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. मोहालीतील गुप्तचर खात्याच्या कार्यालयावर झालेला हल्ला असेल अथवा सिमल्यात विधानसभेवर खलिस्तान्यांनी फडकावलेला झेंडा असेल, याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.
पाकिस्तान आणि चीन हे भारताचे पारंपरिक शत्रू गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी दहशतवादाचेे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न जोमाने करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि सत्तांतर होऊन तेथे आम आदमी पक्षाचे सरकार आले. 'आप'चे भगवंत मान नवे मुख्यमंत्री बनले. तथापि, या निवडणुकांच्या काळात आम आदमी पक्षाला खलिस्तान्यांकडून मदत मिळाल्याची चर्चा संपूर्ण पंजाबमध्ये पाहायला मिळाली.
काही महिन्यांपूर्वी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणवीरसिंग चन्नी यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते आणि त्यामध्ये त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिल्याचा उल्लेख केला होता. बंदी असलेल्या शीख फॉर जस्टिस नावाच्या संघटनेचा नेता गुरुचरण पन्नू हा आम आदमी पक्षाच्या सातत्याने संपर्कात असतो आणि 2017, 2022 च्या निवडणुकीत त्यांनी 'आप'ला मदत केल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.
चन्नी हे काँग्रेसचे असल्याने राजकीय विरोधातून त्यांनी केलेल्या आरोपांकडे पाहणे चुकीचे ठरेल. कारण, कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवालांचा संबंध खलिस्तान्यांशी असल्याचा आरोप केला होता. त्याबद्दलचा पुरावाही त्यांनी समोर आणला होता. परंतु, त्याची चौकशी होण्याऐवजी कुमार विश्वास यांनाच कसे लक्ष्य केले गेले, हे सर्वांनीच पाहिले असेल. वास्तविक, विधानसभा निवडणुकांनंतरचे पंजाबमधील सध्याचे वातावरण पाहून 1980 च्या दशकातील खलिस्तानी चळवळींसारखीच स्थिती आताही निर्माण होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पंजाबमध्ये ड्रोनच्या मदतीने आरडीएक्स आणले जात आहेत. रॉकेट प्रॉपेर्ड ग्रेनेडस् म्हणजेच आरपीजी आणले जात आहे.
काही दिवसांपूर्वी मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर आरपीजीच्या साहाय्याने हल्ला झाला. तिसर्या मजल्यावर जाणे तसे सोपे नाही. परंतु, रॉकेट प्रॉपेर्ड ग्रेनेडची रेंज दीड ते दोन किलोमीटर असते. रॉकेट लाँचरच्या साहाय्याने खालून हा हल्ला करण्यात आला. ही गंभीर घटना आहे. कारण, अशा प्रकारे रॉकेट लाँचरद्वारे हल्ला यापूर्वी कधीही झाला नव्हता. मोहालीतील गुप्तचर खात्याच्या इमारतीत गुप्तचर विभागाच्या प्रमुखांसह अनेक बडे अधिकारी असतात. अशा संवेदनशील ठिकाणाला दहशतवाद्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. गुप्तचर खात्याच्या इमारतीवर ग्रेनेड टाकण्यासाठी हल्लेखोर एकदाच आले असे नाही. त्यांनी तीन-चार वेळेस या भागाची रेकी केल्याचेही उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी एवढी रेकी करूनही त्याची भनक कोणालाही लागली नाही, हे धक्कादायकच आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणामधील कर्नाल येथून चार दहशतवादी पकडण्यात आलेे. या दहशतवाद्यांकडून तीन आयईडीज आणि एक पिस्तूल व 31 काडतुसे जप्त केली. या दहशतवाद्यांचा संबंध बब्बर खालसा या दहशतवादी गटाशी आहे. तरमतारम या भागात चार किलो आरडीएक्स जप्त केले होते. डिसेंबर 2021 मध्ये पंजाबमध्ये दोन किलो आरडीएक्सचा स्फोट झाला होता आणि त्यामध्ये एक जण मरण पावला होता आणि 4 जण जखमी झाले होते. त्यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये पठाणकोटमध्ये लष्कराच्या कॅन्टोन्मेंटजवळ एक स्फोट झाला होता. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जलालाबाद या पंजाबमधील एका छोट्या गावात मोटारसायकलचा स्फोट झाला होता. 13 ऑगस्ट 2021 रोजी पंजाबमध्ये एक हँडग्रेनेड सापडले होते. मोहालीतील हल्ल्याचा एकूण तपास आणि त्यातून आलेली माहिती पाहता हा एक सुनियोजित कट असल्याचे दिसून येते.
विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीपासून आणि प्रचाराच्या काळातही हा विषय चर्चिला जात होता की, पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने पंजाबमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना रसद पुरवत आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2021 मध्ये ड्रोनच्या 59 हालचाली नोंदवण्यात आल्या आहेत. यातील काही ड्रोन्सना पाडले; पण पाडण्यात न आलेल्या अनेक ड्रोन्समधून दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवली गेली असण्याची दाट शक्यता आहे.
पंजाबच्या सीमेवरून एक सबमशिनगन, एक रायफल, एक एके47 रायफल, एक बंदूक अशा प्रकारची अनेक शस्त्रास्त्रे पाठवली जाताहेत. पूर्वी ही शस्त्रास्त्रे माणसाकडून पाठवली जायची. परंतु, आता सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. बीएसएफचे जवान तेथे तैनात आहेत. परंतु, त्यांच्याकडून ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे तसे होत नाही. कारण, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर अफू, चरस, गांजा यासारख्या अमली पदार्थांसह शस्त्रास्त्रे, दारुगोळा पाठवत आहे. स्मग्लिंग जोरदार सुरू आहे. त्यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक भक्कम, चौकस करण्याची गरज आहे.
पंजाबमध्ये आणि काश्मीरमध्ये कार्यरत दहशतवाद्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने लष्करे खालसा नावाचा एक गट तयार केला आहे. या गटाला अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या साहाय्याने विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे या परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये येत असलेल्या काही गाड्या अडवून त्यांच्याकडून खलिस्तान्यांनी खंडणी वसूल केल्याच्या घटनाही घडल्या. खलिस्तान्यांना पाकिस्तानातून आणि देशातील काही घटकांकडून मदत मिळत असल्याने त्यांच्या कारवाया वाढताना दिसताहेत.
हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये विधानसभेवर खलिस्तानचा झेंडा लावला गेला आणि खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या. यावरून खलिस्तान्यांची मजल कुठवर गेली आहे, याची प्रचिती येते. या सर्व घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. केवळ सुरक्षा दलांनीच नव्हे, तर पंजाब आणि शेजारच्या अन्य राज्यांतील सर्वसामान्य नागरिकांनीही अत्यंत सतर्क-सजग राहून भवतालच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कारण, दहशतवाद मग तो कोणताही असो त्याची किंमत अंतिमतः समाजालाच मोजावी लागते आणि ती भीषण असते.