

रवींद्र खरे
अष्टीची निर्मिती आणि तिचे नियमित चलन-वलन याचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न माणूस करोडो वर्षे करीत आहे. शास्त्रज्ञ त्यांना अवगत असलेले मार्ग आणि साथने वापरतात, तर परामानवी शाख्ा जाणणारे संत त्यांना साध्य झालेली साधने वापरतात आणि हे दोघेही एकाच ठिकाणी पोहचतात आणि म्हणूनच जिथे भौतिकशास्त्राची सीमारेखा असते, तिथून पुढे आध्यात्माचे राज्य सुरू होते. माणूस प्रामाणिक प्रयत्न करूनही हवे ते मिळवू शकत नाही, तेव्हा त्याला असे का होते, हा प्रश्न पडतो. कधी कधी नैराश्यसुद्धा येते आणि याची समजूत घालण्यासाठी कृष्ण म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ॥ तुझा अधिकार तुझ्या कर्मावर फक्त आहे, कर्म फलावर नाही, हे जाणून काम कर.
याचाच दुसरा अर्थ या जगात प्रत्येक जण करीत असलेला प्रत्येक कर्माचा नियंता दुसराच कोणी तरी आहे आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न शास्त्राच्या मर्यादेत शास्त्रज्ञ करतात, तर अध्यात्माच्या अमर्यादेत संत करीत असतात. आणि हे दोघे मिळून एक समान जीवनधर्म माणसाला देतात, त्यालाच आपण सनातन धर्म असे म्हणतो. शास्त्र असे म्हणते की, प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे. पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गतीही ताशी १६७४ किमी आहे. मग ही गती या कक्षा नियंत्रित करणारा कोण? आणि तो नेमका या ब्रह्मांडात कुठे आहे? शास्त्रज्ञ यान पाठवून शोधतात, ध्वनिलहरी, प्रकाशलहरींचा, स्पंदनलहरींचा अभ्यास करून शोधतात. पण, विश्वाच्या पसाऱ्यात हिंडायला या सगळ्या गोष्टींचा वेग फारच तोकडा आहे. त्याहून वेगवान काहीतरी हवे. हे जे गतिमान वाहन आहे, ते आपल्या संतांजवळ आहे. ते म्हणजे मानवी मनाची क्षमता आणि गतिमानता, मन हे प्रकाशकिरणांहूनही कितीतरी वेगवान आहे.
त्या वेगाने जाण्याची क्षमता आपल्याला मिळाली तर आपण या विश्वातील अनेक रहस्ये उलगडू शकतो, पाहू शकतो. मात्र, त्यासाठी मनावर चित्ताचा !!! प्रचंड ताबा पाहिजे. आपले संत, तपस्वी, यति यांनी एकच जन्म नाही, तर प्रत्येक जन्मात तो ध्यास घेतला, ती तपश्चर्या केली. तेव्हा एका जन्मात त्यांना ते साध्य झाले. त्या विश्वात्म्यांच्या अगोचर स्वरूपाला ते पाहू शकले. "नामा म्हणे मज विठ्ठल सापडला" या ओळीत नामदेव महाराज स्पष्ट करतात की, ते कशाचा शोध घेत होते आणि त्यांनी त्याला शोधले. ज्ञानेश्वर महाराजही हेच म्हणतात, || "हरी पाहिला मी हरी पाहिला आजि सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु || हीच अनुभूती तुकाराम महाराजांना आली की, "पैल उभा पांडुरंग", पूर्ण निरक्षर सोयराबाईंनी तर शास्त्रीय परिभाषेत लिहिले की, "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग". आपण आपल्या मर्यादित संतांना पाहतो, म्हणून त्यांची अमर्याद अनुभूती आपल्याला जाणवत नाही. सगळ्यांना शोधायचा आहे तो जगनियंता, आता त्याचे शास्त्रीय स्वरूप आपण पाहू. मूळ शब्द आहे विस्थल. त्याची फोड वि-स्थल. स्थल म्हणजे स्थान. पण, हे 'वि'ने विभूषित स्थान म्हणजे काय, तर 'विस्थल' या शब्दात 'वि' दोन अर्थाने येतो "वितरती-विचनोतीच विस्थलम्" म्हणजे असे स्थान की जे प्रसरण पावते.
पण, किती ते कोणालाही मोजता येत नाही आणि 'विचनोती' म्हणजे आकुंचन पावते. थोडक्यात, सूक्ष्म होते ते किती? तर तेही मोजता येत नाही. असे संजीवक स्थान म्हणजे 'विस्थल', अपभ्रंशित उच्चार विठ्ठल - विठ्ठल. आता असा प्रश्न पडतो की, इतर जे शब्दार्थ दिले आहेत ते चुकीचे आहेत का? तर नाही, कारण प्रत्येक शब्दाला अर्थाचे अनेक कंगोरे असतात. म्हणून शब्दार्थ, लक्षार्थ, भावार्थ, गूढार्थ, अन्वयार्थ अशी अनेक रूपं आपण शब्दाला देतो. विटे ठेला म्हणजे विटेवर उभा राहिला. म्हणून तो विठ्ठल का? तर हो हेही बरोबरच, चिन्ह संकेतात 'वीट' हे स्थिरतेचे प्रतीक आहे. माउली म्हणतात - "दृढ विटे मन मुळी, विराजित वन माळी" परमेश्वर पाहण्यासाठी मंत्र ते देत आहेत. मुळात मन सर्वांत अस्थिर, चंचल, ते एकमार्गी नाही, त्यात दृढता नाही. जर परमेश्वर हवा असेल, तर मनाची मुळी दृढ, ठाम विटेप्रमाणे भार पेलणारी हवी, थोडक्यात, धारणा दृढ हवी, म्हणजे पाया भक्कम रोवलेला असेल तर प्रचंड उंच इमारत उभारता येईल, यश मिळेल. दृढ संकल्प हवा, वारकऱ्यांप्रमाणे काहीही झाले तरी वारी करणारच, हीच पांडुरंगभेटीची पहिली पायरी असते. अशी वारी पिढ्यान् पिढ्या होते. तेव्हाच त्याला पांडुरंगाची भेट घडते. हाच मनोनिग्रहाचा वस्तुपाठ त्या वनमाळीने भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला ज्या ठिकाणी दिला ते हे पवित्र स्थान.
हजारो वर्षांपूर्वीचे नाव दिंडीरवन, आत्ताचे नाव पंढरपूर. पंढरपूर का? तर पंचतत्त्वांचे मूर्तरूप श्री विठ्ठलमूर्ती तिथे आहे म्हणून, एकनाथ महाराज म्हणतात काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, एकनाथ महाराज म्हणतात - "माझे माहेर पंढरी" खरोखर पंढरपूर सामान्य गाव नाही. जिथे कृष्ण रुक्मिणी राहिले, जिथे तुळशीचे रान होते, म्हणून रुक्मिणी रमली, जिथे रुक्मिणीमातेचे विश्वालयाशी एकरूप होणे, भगवान कृष्णाने अलिप्ततेने पाहिले अशी ही पुण्यभूमी. आमचे खरे शास्त्रज्ञ संतवेडे नाहीत, की ते उगाचच काही करतील. ज्या पुण्य पावनस्थानी परमेश्वर रमतो, तिथेच आमचे ज्ञानी संत त्या कैवल्याची - केवलम् शांत मूर्तीची पूजा करायला येतात. त्या शांत मूर्तीतून परावर्तित होणारे ज्ञानकण वेचतात आणि पुढच्या पिढ्यांकरिता तो पुण्याचा म्हणजेच ज्ञानाचा साठा वितरित करतात. अत्यंत निरपेक्ष, निर्लेप मनाने कोणत्याही प्रत्युपकाराशिवाय, ज्या मूर्त रूपातून तिच्या अदृश्य प्रकाशातून हे ज्ञान आपल्याला मिळते. ते रूप म्हणजेच 'विठ्ठल' रूप. त्यालाच नामदेव महाराज म्हणतात निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, प्रचंड ज्ञान निधीचा साठा म्हणजे विठ्ठल. अखंड (निरंतर) ज्ञानाचा स्रोत म्हणजे विठ्ठल. आपुलिया बळे नाही मी बोलत, परि त्या विश्वंभरे बोलविले || रामकृष्ण हरी पांडुरंग हरी || (संत तुकाराम महाराज यांचे वचन आहे.)