

लंडन ः तुमच्या सोबतही असे बर्याचदा झाले असलेच, तुम्ही एका ठिकाणी बसलेले असताना अचानक एखादे काम आठवते आणि तुम्ही उठून दुसरीकडे जाता; पण नंतर तिकडे कशासाठी आला होतात हेच लक्षात येत नाही. तसेच, एखादी वस्तू आणण्यासाठी एका खोलीतून दुसर्या खोलीत जाता; पण तिथे गेल्यावर आठवतच नाही कोणती वस्तू घ्यायची होती. अनेकजण याचे कारण मानसिक ताण समजून दुर्लक्ष करतात; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे का होते? तुम्हाला वाटत असेल की, हे मेंदूशी संबंधित एका आजाराचे लक्षण आहे; पण खरं तर हे तुमचा मेंदू अगदी योग्यरीत्या काम करत आहे, याचा संकेत आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. चला तर मग यामागचे रहस्यमयी वैज्ञानिक कारण जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते या स्थितीला ‘डोरवे इफेक्ट’ असे म्हटले जाते. मानवी मेंदू माहिती साठवण्यासाठी इव्हेंट मोडेलिंग नावाचे तंत्र वापरतो. जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसर्या खोलीत जाता, तेव्हा मेंदूला वाटतं की एक अध्याय संपला आणि दुसरा सुरू झाला. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, खोलीचा दरवाजा ओलंडणे म्हणजे मेंदूसाठी एका फाईलमधून दुसर्या फाईलमध्ये जाण्यासारखे आहे. हे असे आहे जसे की, तुम्ही मोबाईलचा वापर करत असताना एका अॅपचा वापर करून झाल्यानंतर दुसर्या अॅपमध्ये जाता तेव्हा, बॅकएंडला सुरू असलेला आधीचा अनावश्यक अॅप बंद करता. मेंदूही असेच करतो. जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसर्या खोलीमध्ये जाता तेव्हा मेंदू आधीची माहिती डिलिट किंवा फ्लश करतो आणि नवीन खोलीत गेल्यानंतर मेंदू तिथल्या वस्तू आणि वातावरणावर लक्ष केंद्रित करू लागतो. ज्यामुळे तुम्ही तिथे कशासाठी आला होतात हे विसरून जाता.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही एक चांगली स्थिती आहे. कारण, हा डोरवे इफेक्ट दर्शवतो की; तुमचा मेंदू नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास अत्यंत वेगवान आहे. जर मेंदू सर्व जुन्या गोष्टी लक्षात ठेवू लागला, तर तो एखाद्या मोबाईलसारखा हँग होऊ शकतो. आणि याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डोरवे इफेक्टमुळे मानवी मेंदू एक प्रकारे रॅम क्लीनरसारखे काम करते. यामुळे नवीन ठिकाणी किंवा दुसर्या खोलीत गेल्यानंतर तिथे काही धोका किंवा महत्त्वाची गोष्ट असेल, तर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येते; पण हे जर वारंवार होत असेल, म्हणजेच फक्त दुसर्या खोलीत गेल्यावरच नाही, तर बोलता बोलता वाक्य विसरत असाल किंवा हातात घेतलेली वस्तू कुठे ठेवायची हेच आठवत नसेल, तर हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. सतत होणारा विसरभोळेपणा हे अतिताण, अपुरी झोप आणि मानसिक थकवा यांचे लक्षण असू शकते.