

नवी दिल्ली : उन्हाळ्यात, हवामान अचानक बदलू शकते आणि कडक उन्हात वादळे येऊ शकतात; पण हे नेहमी दुपारी किंवा संध्याकाळी का घडते हे तुमच्या कधी लक्षात आले आहे का? सकाळी वादळे कधीच का येत नाहीत? हवामान नेहमी संध्याकाळीच का बदलते? या मागचं कारण नेमकं काय? जाणून घेऊयात...शास्त्रज्ञांच्या मते, वादळांसाठी अस्थिरता, वरच्या दिशेने जाणारी गरम हवा आणि आर्द्रता यांची आवश्यकता असते. या सर्व परिस्थिती दिवसाच्या उत्तरार्धात सर्वाधिक तीव्र असतात आणि सकाळी त्या बहुतांशी अनुपस्थित असतात.
सूर्य उगवल्यापासून पृथ्वीचा पृष्ठभाग तापवत राहतो. जमीन सौरऊर्जा शोषून घेत असताना, तिचे तापमान हळूहळू वाढते आणि साधारणपणे दुपारी ३ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान ते सर्वोच्च पातळीवर पोहोचते. ही तीव्र उष्णता वातावरणात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवते, ज्यामुळे नंतर वादळे निर्माण होऊ शकतात. जसे जमीन तापते तसतसे जमिनीच्या संपर्कात येणारी हवासुद्धा तापते. गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी असते त्यामुळे ती वेगाने वरच्या वातावरणात जाते. या हालचालींमुळे पृष्ठभागाजवळ कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो. उष्णता जितकी जास्त, तितक्या वेगाने हवा वर जाते आणि वातावरण तितकेच अस्थिर होते. वर जाणाऱ्या गरम हवेमुळे निर्माण झालेला कमी दाबाचा प्रदेश भरण्याची गरज असते.
यामुळेच आजूबाजूच्या भागांतील थंड, दमट हवा वेगाने त्या भागाकडे जाते. वाऱ्याच्या या उच्च वेगामुळे अनेकदा जोरदार वारे आणि धुळीची वादळे निर्माण होतात. रात्रीच्या वेळी, पृथ्वीच्या पृष्ठभागाची उष्णता कमी होते आणि तो लक्षणीयरीत्या थंड होतो. पर्वतांमध्ये जमिनीजवळील हवा थंड आणि स्थिर असते. उष्णतेच्या अभावामुळे वातावरणात जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण करण्यासाठी कमी ऊर्जेची आवश्यकता असते. यामुळे वादळ निर्माण होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. वादळ सहसा दुपारनंतर तयार होतात; पण चक्रीवादळे याला अपवाद आहेत. ती कधीही तयार होऊ शकतात, जरी ती बहुतेकदा दुपारनंतर तयार होतात. त्यांची उत्पत्ती दूरवरून होत असल्यामुळे त्यांना उत्तर भारतात पोहोचायला कधीकधी एक-दोन दिवस लागतात. त्यामुळे ती दिवसाच्या कोणत्याही वेळी येऊ शकतात. शिवाय, मान्सून प्रणाली दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी प्रभाव टाकू शकतात. कारण, त्या सौर उष्णतेवर अवलंबून नसतात.