

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काही खगोलीय घटनांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. त्यांनी भारताच्या आकाशातील तार्यांचं निरीक्षण केलं आहे. आकाशातील तारे कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आकाशातील कोणता राक्षस या तार्यांना गिळत आहे, याची चर्चा होत आहे. पूर्वी गावात अथवा छोट्या शहरात रात्रीच्या वेळी आकाश अगदी निरभ्र, स्वच्छ आणि तार्यांनी झाकोळलेले दिसायचे. असंख्य तारे लुकलुकत असलेले दिसायची. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता शहरातील तीव— प्रकाश आणि प्रदूषणामुळे आकाश तितके स्वच्छ उरलेले नाही. त्यामुळे आकाश अस्पष्ट आणि अंधुक दिसते. दिल्ली, मुंबई सारख्या बड्या शहरांची स्थिती अधिक वाईट आहे. आता अंधारून आल्यानंतरही पूर्वी इतके तारे नजरेस पडत नाही. लहान मुलांना तर आकाशातील लुकलुकणार्या तार्यांचे आकर्षण कमीच झाले आहे!
लडाख येथील हॅनले आणि महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील पेंच येथील डार्क स्काय रिझर्व्ह भागातून आकाश निरभ्र, स्वच्छ दिसतं. कारण इथं काळोख पसरलेला असतो. इथून आकाशगंगा अगदी स्पष्ट दिसते. काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागातून अशीच स्पष्ट आकाशगंगा दिसत होती. अनेक तारे न्याहळता येत होते. आकाश इतके चमकदार होते की त्याचे प्रतिबिंब नदी, धरणं, तलावाच्या पाण्यात जणू परावर्तीत होण्याचा भास होत होता. तारे गायब होण्यामागील सर्वात मोठे कारण कृत्रिम प्रकाश हे आहे. लाईट, स्ट्रीट लाईट यामुळे आकाशातील तार्यांचा प्रकाश झोकाळून जातो.
या प्रकाशामुळे आकाश अंधुक होते. हवेतील धूळ, प्रदूषण यामुळे तर आकाशाचे सौंदर्य हरवत चालले आहे. चंद्र आणि चांदण्यांना धरून अनेक गीतं आणि गझलांनी आपल्या मनाची तृप्ती होते. पण ज्यावर हे काव्य तयार झाले, तेच आता आपल्यातून हरवत चालल्याचे समोर येत आहे. केवळ मानवालाच नाही तर पशू पक्षी, प्राणी यांनाही या मानवी हस्तक्षेपाचा त्रास होत आहे. अनेक भागात रात्रीच्या वेळी या तार्याच्या प्रकाशात विहार करणार्या प्राण्यांना भ्रमंतीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही फुलं ही रात्रीच्या वेळी उमलतात. त्यावरही परिणाम होत आहे.