

नवी दिल्ली ः साप म्हटलं की, अनेकांची पाचावर धारण बसते. जगभरात सापाच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आहेत. त्यातील काही तर अत्यंत विषारी आहेत. दंश करताच माणसाचा काही सेकंदांत मृत्यू होतो. एका अहवालानुसार, भारतात सापाच्या एकूण 69 प्रजाती आहेत. यामध्ये 29 समुद्रातील साप आहेत. तर 40 जमिनीवरील आहेत; पण साप उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक दिसतात; पण ते हिवाळ्यातच का गायब होतात? काय आहे त्यामागील कारणं?
शास्त्रज्ञांच्या मते, सापांची झोपेची वेळ ही वातावरण, तापमान आणि त्यांचे भक्ष्य यावर अवलंबून असते. थंडीच्या काळात साप हे सुरक्षित ठिकाणी झोपतात. सापाचे रक्त हे थंड असते. त्यामुळे त्यांचे शरीर हे तापमान स्वतः नियंत्रित करू शकत नाही. त्यामुळे ऐन हिवाळ्यात त्यांच्यावर सुस्ती चढते. ते अधिक ऊर्जा खर्ची घालत नाहीत. ते एखाद्या बिळात, दगडांखाली अथवा दाट झाडीत लपून बसतात. हिवाळ्यात साप हे कित्येक आठवडा अथवा महिनाभर झोपतात. त्याला हायबरनेशन, थंडीतील झोप असे म्हणतात.
तापमान अनुकूल झाल्यावर, उष्णता वाढल्यावर साप सक्रिय होतात. ते दिवसा कमी आणि रात्री जास्त दिसतात. कारण, त्यांना थंड वातावरण आवडते. साप झोपलेला असताना त्याच्या श्वासाची गती आणि लय मंदावते. एखादा आवाज अथवा हालचालीवर ते लागलीच प्रतिक्रिया देत नाहीत. उन्हाळ्यात वातावरण अधिक उष्ण असल्याने साप दिवसा बाहेर पडत नाहीत. 10 ते 12 तास आराम करून ते रात्री बाहेर पडतात. तर पावसाळ्यात पावसामुळे आणि थंडपणामुळे ते दिवसा बाहेर पडत नाहीत. तर रात्री सावज टिपण्यासाठी ते बाहेर पडतात; पण जसे तापमान वाढते तसे साप बिळात लपतात.
हिवाळ्यातील तीन महिन्यांत ते अनेक दिवस काही न खाता जिवंत राहू शकतात. सापाची झोप ही साधारणपणे 12 ते 16 तास इतकी असते; पण हिवाळ्यात ती अधिक वाढते. वाळवंटातील साप इतर सापांपेक्षा वेगळे वागतात. ते उन्हाळी झोप घेतात. उन्हाळ्यात दिवसा आणि रात्रीसुद्धा उष्ण वातावरण असते. त्यामुळे ते सुरक्षित आणि थंड ठिकाणी ताणून देतात. त्यामुळे भीषण उन्हाळ्यात ते जिवंत राहतात. या झोपेच्या काळात सापाची त्वचा बदलण्याची प्रक्रियाही सुरू होते. सुरक्षित ठिकाणी साप कित्येक दिवस झोपेतून उठत नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सावज शोधण्यासाठी ते बाहेर येतात.