

वॉशिंग्टन : चंद्राची ऐतिहासिक प्रदक्षिणा पूर्ण करून आर्टेमिस-2 मोहिमेतील चार अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहेत. कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळ प्रशांत महासागरात त्यांचे ‘ओरियन’ अंतराळयान यशस्वीपणे उतरले. या यशानंतर आता सोशल मीडियावर एका अजब प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ‘जेव्हा अंतराळवीर समुद्रात उतरतात, तेव्हा तिथे असलेल्या शार्क माशांपासून त्यांचे संरक्षण कसे केले जाते?’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘द’ वर चेस्टन बुटिगीग नावाच्या युजरने प्रश्न विचारला होता की, ‘आसपास शार्क नाहीत ना, याची खात्री कोणी करतं का?’ यावर नासाने स्पष्टीकरण दिले की, अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी अनेक स्तरांची यंत्रणा सक्रिय असते. रिकव्हरी टीम अंतराळयान समुद्रात उतरण्यापूर्वीच त्या संपूर्ण क्षेत्राची कसून तपासणी करते. यान उतरल्यानंतरही टीम सतत लक्ष ठेवून असते, जेणेकरून अंतराळवीरांचे स्वागत केवळ मानवी टीमकडूनच होईल, शार्ककडून नाही. नासाच्या या उत्तरानंतर नेटकर्यांनी मजेशीर कमेंटस् केल्या आहेत.
एका युजरने विचारले, ‘जर शार्क दिसलीच तर टीम तिला पळवून लावते का?’ तर दुसर्याने ‘जॉज’ चित्रपटाचा संदर्भ देत लिहिले की, ‘कोणाचे तरी काम फक्त एवढेच असेल की तिथे ‘जॉज’सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये.’ आर्टेमिस 2 मोहिमेतील कमांडर रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सेन या चार अंतराळवीरांनी 7,00,237 मैलांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान यानाचा जास्तीत जास्त वेग 24,664 मैल प्रति तास इतका होता. या मोहिमेद्वारे अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक डेटा गोळा करण्यात आला आहे, ज्याचे विश्लेषण भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी मोलाचे ठरेल.