

मुंबई : चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे. थंडीत खास करून ही भाजी आवर्जुन केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाय शरीरालाही मजबूत बनवते. या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात.
चाकवतची भाजी आपल्याकडे बहुतांशी शेंगदाणे किंवा वाटाणे घालून केलेल्या गरगट्याच्या स्वरूपात खाल्ली जाते. काही लोक चाकवत भाजीचा पराठाही करतात. चाकवत भाजीत विटामीन ए, सी, आयर्न आणि कॅल्शियम भरपूर असते. चाकवत भाजीत मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासाठी ही भाजी गुणकारी आहे. पचन यंत्रणा जर चांगली राखायची असेल, तर चाकवत खाणे चांगले आहे. ही भाजी पचनसंस्था दुरुस्त करते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. ज्या लोकांना गॅस, अॅसिडीटी आणि पोट फुगणे अशा तक्रारी असतील त्यांच्यासाठी ही भाजी औषधापेक्षा कमी नाही.
चाकवत रक्तदेखील शुद्ध करते, त्वचेला चमकदार बनवते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. संधीवात, गुडघे दुखी, उच्च रक्तदाबाच्या समस्या दूर ठेवण्यासाठीही चाकवत भाजी फायदेशीर ठरते. थंडीत रोजच्या आहारात या भाजीचा समावेश केला, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच, शरीरात उष्णताही वाढेल. मात्र, चाकवत खाताना काही पथ्येही पाळावी लागतात. चाकवत भाजी ही उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी ही भाजी मर्यादित प्रमाणात खावी.