

नवी दिल्ली : आता थंडीला चांगलीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातून जॅकेट, शॉल आणि इतर गरम कपडे बाहेर आले असतील. तुम्ही पाहिलं असेल किंवा अनुभवलं देखील असेल की काही लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. मात्र, यामागचं कारण हे शोधण्याचा अनेकजण प्रयत्न करत नाहीत आणि यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. यामागे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. असं का घडत आणि त्याचे उपाय काय याविषयी जाणून घेऊयात.
शरीरातील थर्मोरेग्युलेशनसाठी अनेक जीवनसत्त्वे कार्य करतात. तेव्हा शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाली की थंडी जास्त जाणवते याविषयी माहिती घेऊयात. शरीराचं तापमान राखणे याला ‘थर्मोरेग्युलेशन’ असे म्हणतात. व्हिटॅमिन बी 12, फोलेट आणि लोह सारख्या जीवनसत्त्वाची कमतरता शरीरात झाली की शरीराची उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि मग अशा व्यक्तींना जास्त थंडी वाजू लागते. शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहची आवश्यकता असते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असून, हे तुमच्या शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते. शरीरात लोहची कमी झाली की हिमोग्लोबिन कमी होऊन ऑक्सिजन योग्यरीत्या शरीरात पोहोचत नाही आणि स्नायूंमध्ये उष्णता निर्माण होत नाही. यामुळे लोकांना जास्त थंडी वाजणे, थकवा, अशक्तपणा यासारख्या समस्या जाणवतात. व्हिटॅमिन बी 12 हे शरीरातील लाल रक्तपेशी आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वाचे ठरते. शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाल्यास लाल रक्त पेशी निर्माण होत नाहीत, यामुळे अॅनिमिया सुद्धा होऊ शकतो. परिणामी, हात, पाय यासारख्या अवयवांना जास्त थंडी वाजते. व्हिटॅमिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. परंतु, त्याची शरीरात कमतरता झाली की जास्त थंडी वाजायला सुरुवात होते. आयर्न म्हणजेच लोहतत्त्व शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्ही ऐकला असालच. मात्र, काही वेळा आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन करूनही आयर्नची कमतरता जाणवते, कारण शरीरात व्हिटॅमिन ‘सी’ची कमतरता असते. शरीरात आयर्न शोषण्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ आवश्यक आहे. जर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी वाजत असेल, तर तुमच्या शरीरात यापैकी कोणत्यातरी व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. त्यामुळे अशी लक्षणं तुम्हाला जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे तज्ज्ञ सांगतात.