

वॉशिंग्टन : पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून सूर्य हा आपला निरंतर सोबती राहिला आहे. पण, जर कधी सूर्य अचानक गायब झाला, तर आपल्या या लाडक्या ग््राहाचे काय होईल? हा विचार करायलाही भीतिदायक वाटत असले, तरी शास्त्रज्ञांनी या परिस्थितीचे अत्यंत गंभीर चित्र मांडले आहे.
सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी वायू आणि धुळीच्या एका महाकाय ढगाच्या आकुंचनातून सूर्याची निर्मिती झाली. आज सूर्य आपल्या सौरमालेतील सर्वात मोठी वस्तू असून, त्याच्या गाभ्याचे तापमान तब्बल 1.5 कोटी अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी ‘गोल्डिलॉक्स झोन’ मध्ये टिकून आहे. हे असे अंतर आहे जिथे खूप उष्णता किंवा खूप थंडी नसते, ज्यामुळे पृथ्वीवर पाणी द्रव स्वरूपात राहू शकते. याशिवाय प्रकाशसंश्लेषण, जलचक्र, हवामान आणि आपल्या शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ या सर्वांसाठी आपण सूर्यावर अवलंबून आहोत.
‘एमआयटी’मधील वातावरणीय विज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक तिमोथी क्रोनिन यांच्या मते, सूर्य गायब झाल्यानंतर पहिल्या 8 मिनिटे 20 सेकंदांपर्यंत कोणालाही काहीच समजणार नाही. कारण, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी इतका वेळ लागतो. 8 मिनिटांनंतर संपूर्ण पृथ्वीवर ‘ब्लॅकआऊट’ होईल. दिवसाची रात्र होईल आणि चंद्रही दिसेनासा होईल, कारण, तो सूर्याच्या प्रकाशानेच चमकतो. सूर्याचे गुरुत्वाकर्षण संपल्यामुळे पृथ्वी आणि इतर ग््राह कशाच्याही आधाराशिवाय अंतराळात सरळ रेषेत भरकटत जातील. सूर्यप्रकाश नसल्यामुळे झाडे अन्न तयार करू शकणार नाहीत (प्रकाशसंश्लेषण थांबेल). यामुळे अन्नसाखळी विस्कळीत होऊन मानवजातीसह पृथ्वीवरील बहुतांश सजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. प्राध्यापक क्रोनिन यांच्या मते, सूर्याचे नाहीसे होणे म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी एका ‘टिकींग टाईम बॉम्ब’सारखे असेल. प्रकाश गेल्यानंतर केवळ वीज, तेल, वायू किंवा आगीच्या साहाय्यानेच कृत्रिम प्रकाश मिळवता येईल; परंतु अन्नाचे उत्पादन करणे ही सर्वात मोठी समस्या बनेल.