जगातील पहिली जमीन, समुद्रकिनारा होता भारतात!

शास्त्रज्ञांचा दावा; झारखंडमध्ये सापडले अब्जावधी वर्षांपूर्वीचे पुरावे
Scientists Claim First Land to Emerge from Ocean Was in India
जगातील पहिली जमीन, समुद्रकिनारा होता भारतात!Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : एक काळ असा होता, जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर फक्त पाणीच पाणी होते, चारही बाजूंना महासागर पसरले होते आणि जमिनीचा कुठेही मागमूस नव्हता. पण हळूहळू काही भागांमध्ये जमीन समुद्रातून बाहेर येऊ लागली. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक दावा केला आहे की, समुद्रातून बाहेर आलेला जमिनीचा पहिला तुकडा भारतातच होता.

या संशोधनातून दोन महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. पहिला, पृथ्वीवर महाद्वीप समुद्रातून बाहेर येण्याची घटना 70 कोटी वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. आणि दुसरा, सुमारे 3.2 अब्ज वर्षांपूर्वी जी जमीन समुद्रातून पहिल्यांदा बाहेर आली, ती भारतात होती. ही महत्त्वपूर्ण माहिती ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ नावाच्या एका प्रतिष्ठित शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा समावेश होता.

जगातील पहिला समुद्रकिनारा : सिंहभूम, झारखंड

या संशोधनातील सर्वात रंजक बाब म्हणजे, शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार जगातील पहिला समुद्रकिनारा भारताच्या झारखंड राज्यातील सिंहभूम जिल्ह्यात तयार झाला होता. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेनुसार, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रियदर्शी चौधरी यांनी भारतातील ‘सिंहभूम क्रॅटन’ नावाच्या प्रदेशातील अत्यंत प्राचीन खडकांचा अभ्यास केला. हा प्रदेश पृथ्वीच्या स्थिर भूभागाचा एक भाग मानला जातो.

काय आहे पुरावा?

शास्त्रज्ञांनी या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी खडकांचे सखोल विश्लेषण केले. झिरकॉन कणांचे विश्लेषण : त्यांनी या 3.1 अब्ज वर्षे जुन्या खडकांमध्ये असलेल्या ‘झिरकॉन’ नावाच्या कणांच्या रासायनिक रचनेचे विश्लेषण केले. नदी आणि समुद्राचे संकेत : या विश्लेषणातून असे दिसून आले की, हे कण नद्या आणि समुद्रांशी संबंधित वातावरणात तयार झाले होते, म्हणजेच त्या काळी जमीन समुद्राच्या वर अस्तित्वात होती. प्राचीन समुद्रकिनार्‍याच्या खुणा : सिंहभूम परिसरात असे वाळूचे खडक सापडले आहेत, ज्यात 3.2 अब्ज वर्षे जुन्या समुद्रकिनार्‍याच्या खुणा आढळल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की, सिंहभूम प्रदेश सुमारे 3.3 ते 3.2 अब्ज वर्षांपूर्वी समुद्राच्या पृष्ठभागावरून वर आला होता आणि तो पृथ्वीवरील सर्वात जुन्या समुद्रकिनार्‍यांपैकी एक असू शकतो.

महाद्वीपनिर्मितीचा नवा सिद्धांत

साधारणपणे, महाद्वीपांची निर्मिती प्लेट टेक्टॉनिक्समुळे (जमिनीच्या प्लेट्सच्या हालचाली) झाली असे मानले जाते. परंतु, या नवीन अभ्यासानुसार, पृथ्वीच्या आतून आलेल्या मॅग्माच्या (वितळलेला उष्ण लाव्हा) उद्रेकाने पहिला महाद्वीप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या शोधामुळे पृथ्वीच्या सुरुवातीच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला असून, जगातील सर्वात प्राचीन भूभाग भारतात असल्याचा दावा निश्चितच एक मोठी आणि अभिमानाची बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news